प्रशांत जाधव
देशमुखांच्या गळ्यात माळ?
मतदारसंघात औद्योगिकीकरणासाठी प्रयत्न करणाऱ्या रणजित देशमुख यांना “आमचं ठरलंय’ टीममधून अधिक पसंती असल्याचे दिसते. राजू शेट्टींनी त्यांच्या घरी पाहुणचार घेत, त्यांच्या कामाचे कौतुक केले. त्यामुळे “एक्स’ फॅक्टर म्हणून सध्या त्यांचे पारडे जडे आहे. मात्र, त्यांची भिस्त डॉ. दिलीप येळगावकर, अनिल देसाई, प्रभाकर देशमुख, प्रभाकर घार्गे यांच्यावर असणार आहे.
…”यांचं’ नुसतं ठरलंय तर “त्यांचा’ प्रचार सुरू
गोरे बंधूंना रोखण्यासाठी सर्वपक्षीय नेते मतदारसंघात एकदिलाने काम करत असले तरी नुसतं “आमचं ठरलंय’ यावरच त्यांचे सगळे अढले आहे. त्याउलट गोरे बंधूंनी गावोगावी गाठीभेटींच्या सत्रांमधून प्रचाराला सुरुवात केल्याचे चित्र आहे.
सातारा – जिल्ह्यात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या “हाय व्होल्टेज’ माण-खटाव विधानसभा मतदारसंघात जुळवाजुळवीच्या राजकारणाला वेग आला आहे. “आमचं ठरलंय’ असे म्हणत गोरे बंधूंना टक्कर देण्यासाठी सज्ज झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांनी आता बारामतीच्या दादांना साकडे घालून मतदारसंघात लक्ष घालण्याची विनवणी केली आहे. माजी आमदार जयकुमार गोरेंचा पाडाव, हे एकच उद्दिष्ट आहे. “अजितदादा आमचं ठरलंय, तुमचं कधी?’ असा प्रश्न सर्वपक्षीय नेत्यांनी विचारला आहे. येथे उमेदवार देताना अजित पवारांनी बारकाईने विचार करावा आणि आम्हाला मदत करावी, अशी मागणी एका जेष्ठ नेत्याने केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
माणचे माजी आमदार जयकुमार गोरे यांच्यावर हुकूमशाही, दादागिरीचा आणि त्यांनी मतदारसंघाचे वाटोळे केल्याचा आरोप सर्वपक्षीय नेत्यांनी केला आहे. या मतदारसंघातील गोरे बंधू सोडून बाकी नेत्यांनी त्यांचा पाडाव करण्यासाठी एकजूट केली आहे. “आमचं ठरलंय’ म्हणत त्यांनी मतदारसंघातील गावागावात रान पेटवले आहे.
या टीममधील माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, अनिल देसाई, रणजित देशमुख, प्रभाकर देशमुख या प्रमुख नेत्यांनी गोरेंच्या राजकीय हद्दपारीचा विडा उचलून वातावरण ढवळून काढले आहे. “आमचं ठरलंय’मधून गावागावात परिवर्तनाची हाक दिली आहे. मात्र, त्यांचे नेमके काय ठरलेय, हे गुलदस्त्यात असून त्यांच्यातील उमेदवार कोण, हा प्रश्नही अनुत्तरीत आहे. याच टीममधील अनिल देसाई, रणजित देशमुख यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचा संदेश दिला. त्यानंतर येळगावकरांच्या कार्यकर्त्यांनीही “हम भी किसीसे कम नही’ म्हणत निवडणुकीसाठी लागणारा निधी गोळा करायला सुरुवात केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी गेल्या आठवड्यात मतदारसंघाचा दौरा केला. त्यावेळी त्यांनी अनेकांच्या गाठीभेटी
घेतल्याने राजकीय घडामोडींना वेग आला.
माण मतदारसंघ राष्ट्रवादीकडून स्वाभिमानीकडे घ्यावा. जयकुमार गोरेंचा पाडाव करण्यासाठी “आमचं ठरलंय’मधून उमेदवार द्यावा. जयकुमार गोरेंचा पाडाव म्हणजे सदाभाऊ खोतांचा पाडाव, असे शेट्टींच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न अनेक नेत्यांनी केला. मात्र, या मतदारसंघाबाबत राष्ट्रवादीने निर्णय घ्यावा, मग उमेदवार कोण याचा विचार करू, असे सांगून शेट्टी निघून गेले. त्यामुळे एक तर हा मतदारसंघ राष्ट्रवादीने स्वाभिमानीला सोडावा किंवा “आमचं ठरलंय’ टीममधील उमेदवाराला पाठिंबा द्यावा, असे साकडे तालुक्यातील एका ज्येष्ठ नेत्याने अजित पवारांना घातले आहे; परंतु आधी तुमचा अंतिम निर्णय घ्या, मग सांगतो, असे म्हणत दादांनीही ठोस शब्द दिलेला नाही.