अकोला: राज्याचे विरोधीपक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोराना पार्श्वभूमीवर विदर्भ दौऱ्यावर आहेत. अमरावती नंतर त्यांनी अकोल्याला भेट दिली. अकोल्यातील कोविड सेंटर, काही क्वारंटाईन सेंटर्सला भेटी दिल्यानंतर स्थानिक प्रशासनाकडून आज येथील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला
काहीदिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी राजू परुळेकर यांनी मुलाखत घेतली होती. त्यामध्ये त्यांनी अनेक खुलासे केले. अजित पवारांसोबत घेतलेल्या शपथविधी बाबत देखील त्यांनी अनेक खुलासे केले. त्यानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली.
दरम्यान, अजित पवार नाराज आहेत अशी चर्चा आहे, ते तुम्हाला आता भेटतात का? असा प्रश्न फडणवीसांना आज पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. त्यावर फडणवीस म्हणाले, अजित पवार सध्या राजी की नाराजी? याबाबत शरद पवारच सांगू शकतील, मी काय सांगू?
तसेच फडणवीस म्हणाले, देशातील एकूण मृत्यूपैकी 46 टक्के मृत्यू हे एकट्या महाराष्ट्रात असल्याने गंभीर परिस्थिती. प्रयत्न आणखी वाढवावे लागणार आहेत. राज्य सरकारला या स्थितीकडे अधिक गांभीर्याने पहावे लागेल.
देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे
– राज्य सरकारकडून महापालिकांना अजूनही आर्थिक मदत नाही, हे दुर्दैवी आहे. यातून कोरोनाविरोधातील लढाई कमकुवत होईल. चाचण्या मोठ्या प्रमाणात वाढविण्याची गरज
– खतं, बियाणं बांधावर देऊ, अशी घोषणा केली गेली.
ते तर मिळाले नाहीच. पण दुकानातून घेतलेले बियाणे पण बोगस निघाले.ते उगवलेच नाही. बियाणे कायद्यानुसार, नुकसानभरपाई शेतकर्यांना मिळावी
– गेल्या काही काळापासून माध्यमांची राज्यात मुस्कटदाबी सुरू आहे.
टीव्ही वाहिन्या, प्रसिद्धीमाध्यमांवर एफआयआर केले जात आहेत.
– महाराष्ट्राने एक चांगली राजकीय संस्कृती जपली आहे. अर्थात ती जपण्याची जबाबदारी सर्वच राजकीय पक्षांची आहे.
भारतीय जनता पार्टीने नेहमीच ही संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला. चंद्रकांतदादांवर टीका झाली, पण, त्याचा कुणी साधा निषेधही केला नाही.
– चीनच्या दुतावासाने राजीव गांधी फाऊंडेशनला जी आर्थिक मदत दिली, त्यावर प्रथम खुलासा बाळासाहेब थोरात यांनी केला पाहिजे. पीएम केअर्सला कंपन्यांनी निधी दिला, त्यात गैर काही नाही. कारण, सीएसआरनुसार कंपन्यांना असे योगदान द्यावेच लागते.
– अंतिम वर्षाच्या परीक्षांच्या राज्य सरकार पूर्णत: संभ्रमावस्थेत आहे. एटीकेटीबाबतचा विचार नाही. परीक्षा झालीच तर मूल्यांकनाची समान पद्धत नाही. संभ्रमावस्थेत न राहता ठोस निर्णय राज्य सरकारने करावा.
– अनलॉक-2 म्हणजे काय?
आणि त्यात काय सुरू होणार आणि काय नाही, याचा सुस्पष्ट खुलासा झाला पाहिजे.