मुंबई – भारतीय जनता पक्षाचे नेते आशिष शेलार यांनी 2017 मध्ये भाजप- शिवसेना- राष्ट्रवादी या त्रिपक्षीय पक्षाची युती होणार होती असा गौप्यस्फोट केला. शेलारांनी केलेल्या या दाव्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘आशिष शेलार हे मोठे नेते आहेत, त्यांच्याशी पवार साहेब थेट बोलले असतील’ असा टोला पवार यांनी शेलारांना लगावला आहे.
अजित पवार म्हणाले, 2017 ला काय झालं, तेव्हा नेते काय बोलत होते आता काय बोलत होते यापेक्षा आत्ता जनतेसमोर काय प्रश्न आहे, समस्या काय आहेत, याकडे लक्ष दिले पाहिजे. राजकारणात काहीही घडत असतं, अशा वेळी काही परिस्थिती निर्माण होते की लोकांना वाटणार नाही असे निर्णय व्हायला लागतात. ममता बॅनर्जी आधी भाजपला समर्थन करत होत्या, नितीश कुमार हे कधी भाजपाला समर्थन करतात कधी विरोधात असतात. अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.
आशिष शेलार यांनी केलेल्या 2017 मध्ये भाजप-शिवसेना-राष्ट्रवादीच्या युतीच्या दाव्यावर बोलताना आशिष शेलार हे मोठे नेते आहेत, त्यांच्याशी पवार साहेब थेट बोलले असतील असा खोचक टोला अजित पवार यांनी लगावला आहे.
काय म्हणाले होते आशिष शेलार
भाजप- शिवसेना- राष्ट्रवादी या त्रिपक्षीय आघाडीचा प्रस्ताव 2017 मध्येच मांडला होता, शिवाय खातेवाटपाची चर्चासुद्धा झाली होती. मात्र राष्ट्रवादीने तेव्हा शिवसेना आघाडीमध्ये घेण्यास विरोध दर्शविला होता. त्यामुळे ही युती होऊ शकली नाही असा मोठा गौप्यस्फोट भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केला आहे. शिवसेनेने सत्तापिपासूपाणाचा परमोच्च बिंदू गाठत काँग्रेस व राष्ट्रवादीबरोबर हातमिळवणी केली, अशी टीकाही शेलार यांनी केली होती.
2017 मध्ये राष्ट्रवादीला सोबत घेऊन भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी या पक्षांनी मिळून त्रिपक्षीय आघाडीचा प्रस्ताव मांडला होता. यावेळी खातेवाटपासह निवडणुकांमधील जागावाटपा संदर्भात सर्व चर्चा झाली होती. सत्ता स्थापन करताना केंद्रीय नेतृत्वाकडून शिवसेनेला सोबत घेऊन सत्ता स्थापन करण्याचे ठरले. हिंदूत्वाच्या मुद्दय़ावर शिवसेनेची साथ सोडू नये, अशी भाजपचा प्रामाणिक भूमिका होती. मात्र शिवसेनेला आघाडी मध्ये घेण्यास राष्ट्रवादीने विरोध दर्शविला. त्यामुळे या तीन पक्षाचे सरकार राज्यात स्थापन होऊ शकले नाही. असा गौप्यस्फोट आशिष शेलार यांनी केला आहे. शिवसेनेने सत्तापिपासूपाणाचा परमोच्च बिंदू गाठत काँग्रेस व राष्ट्रवादीबरोबर हातमिळवणी केली अशी टीका शेलार यांनी केली.