पुणे : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते पोलिसांना स्मार्ट वॉच आणि स्पोर्ट्स सायकल वाटप करण्यात आलं. त्याचसोबत अजित पवार यांच्या हस्ते ग्राम रक्षक दलाचाही शुभारंभ झाला. पोलिसांचा वचक हा सामान्य नागरिकांवर नव्हे, तर गुन्हेगारांवर असायला हवा. सामान्य नागरिकांना पोलिसांकडे मदत मागायला येताना भीती वाटता कामा नये, असं अजित पवार यांनी बोलताना सांगितलं.
“मी कोरोना काळात पोलिसांनी दिलेल्या सेवेला सलाम करतो. वाहनांचं जळीतकांड, वाहनांची तोडफोड, व्यापाऱ्यांना गुंडांकडून होणार त्रास, यासह विविध गुन्हे कायमचे बंद करा. कोणाची हयगय करू नका. एकाला ही पाठीशी घालू नका. माझ्या व्यतिरिक्त कोणाचा फोन आला, तर मला सांगा, मी त्यांना बघून घेतो.” , असं अजित पवार यांनी पोलिसांना सांगितलं.
पुढे बोलताना ते म्हणाले की, “गुंडांचा बंदोबस्त करा, त्यांचा नायनाट करा, कायद्याच्या चौकटीत राहून करा. असं सांगत असताना, मी ही पोलिसांना तेवढ्याच सुविधा देणं गरजेचं आहे. मी ते करतोय, लवकर महाराष्ट्रातील बेस्ट आयुक्तालय करणार. पण त्या इमारतीतून तसंच बेस्ट काम व्हायला हवं.”
राज्यात मोठी पोलीस भरती करण्यात येणार असून त्याची प्रक्रिया सुरु झालेल्याचे सांगितले. त्यासाठी एसी-बीसी उमेदवारांना गृहखात्याकडून दिलासा देण्याचं काम होतंय, असंही सांगितलं. तसेच यावेळी बोलताना गुन्हेगारांना पाठीशी घालू नका. माझ्या व्यतिरिक्त कोणाचा फोन आला, तर मला सांगा, मी त्यांना बघून घेतो, अशा सूचनाही अजित पवार यांनी पोलिसांना दिल्या आहेत.
नारायण राणे असो की भाजप त्यांनी काहीही बोलावे. पण आम्ही तिन्ही पक्ष योग्य पद्धतीने सरकार चालवतोय. त्यामुळे सरकार पडणार असं म्हणू दे नाहीतर मातोश्रीतून सरकार चालतंय असं म्हणू दे”, असं म्हणत विरोधकांवर अजित पवार यांनी निशाणा साधला आहे. पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, “चंद्रकांत पाटील यांच्या गावात राष्ट्रवादी आणि काँग्रेसने भाजप सोबत युती केली, हे अतिशय चुकीचं झालंय. याबाबत चर्चा झाली. ज्यांच्या विरोधात आम्ही काम करतोय, त्याबाबत तिथल्या नेत्यांना योग्य सूचना दिलेल्या आहेत. त्या युतीचं कोणीही समर्थन करणार नाही.”