मुंबई – विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा शुक्रवारी शेवटचा दिवस होता. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र डागले. त्यांनी ठाकरे गटाकडून वारंवार होत असलेल्या टीकांचा खरपून समाचार घेतला. यानंतर विरीध पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिले. यावेळी पवार यांनी शिंदेंना मुख्यमंत्रीपदाच्या जबाबदाऱ्यांची आठवण करुन दिली.
तसेच, शिंदे-फडणवीस सरकारने हिवाळी अधिवेशनात नुसत्या घोषणांचा पाऊस पाडून महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोपही अजित पवार यांनी केली. तसेच, ‘छत्रपती संभाजीराजे हे धर्मवीर नव्हते, ते स्वराज्यरक्षक होते’, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. मात्र, त्यांच्या या व्यक्तव्यावरून आता महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, भाजपने अजित पवारांना घेरण्याची तयारी सुरु केली आहे.
अश्यातच आता भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना ‘भारतात राहण्याचा अधिकारच नसल्याचं सांगत त्यांना पाकिस्तानात पाठवण्याची मागणी केली आहे’. नरेंद्र पवार यांच्या या व्यक्तव्यामुळे आता एकच खळबळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे. यावेळी ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
यावेळी बोलताना नरेंद्र पवार यांनी थेट अजित पवार यांचं नाव घेऊन हल्ला चढवला आहे. ते म्हणाले, “अजितदादांनी जे विधान केलं त्याबद्दल खरंतर त्यांना हिंदुस्थानातून हाकलून दिलं पाहिजे. पाकिस्तानमध्ये त्यांची रवानगी केली पाहिजे. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास ज्या नेत्याला माहीत नाही ते महाराष्ट्राचं दुर्देव आहे, मी निषेध करणार नाही. पण खरंच अजित पवार यांची रवानगी पाकिस्तानात केली पाहिजे अशी मागणी मी करेल.” असं नरेंद्र पवार म्हणाले.
तसेच ते पुढे म्हणाले, “संभाजी महाराज यांनी शेवटच्या श्वासापर्यंत धर्म बदलला नाही. औरंगजेबाने त्यांचे हाल केले, त्यांनी धर्मांतर करावे म्हणूनच हाल केले. पण संभाजी महाराजांना धर्माचा अभिमान होता. त्यांनी धर्मासाठी प्राणांची आहुती दिली’. असं ते यावेळी म्हणाले.