मुंबई : मराठा आरक्षणावरुन राज्य सरकारवर सध्या विरोधकांकडून टीका होत आहे. विरोधकांच्या याच टीकेला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. “राज्य सरकार मराठा आरक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असून आधीच्या काळात होते त्याच्यापेक्षा जास्त वकील दिले असल्याचं,” अजित पवार यांनी सांगितले आहे. “आता जर कोणाला राजकारणच करायचं असेल आणि गैरसमज पसरवायचे असतील तर त्याला कोणी थांबवू शकत नाही,” असेही त्यांनी म्हटले आहे.
हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत असून त्या पार्श्वभूमीवर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. दरम्यान याआधी विरोधकांकडून सभागृहाच्या पायऱ्यांवर मराठा आरक्षणाला गांभीर्याने न घेणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा देत आंदोलन करण्यात आले. तसेच “मुख्यमंत्र्यांनी कालच्या पत्रकार परिषदेतच ओबीसीबद्दलचे प्रश्न असतील किंवा मराठा समाजासंबंधी आरक्षणाचे प्रश्न असतील, कोणालाही धक्का न लावता हे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. मराठा आरक्षणाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. तारीख पुढे ढकलली आहे हे सर्वांना माहिती आहे. तारखेच्या वेळी चांगले वकील देण्याचं काम राज्य सरकार करत आहे,” असे अजित पवारांनी सांगितले.
राज्य सरकार योग्य भूमिका मांडत नसल्याच्या विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले की, “योग्य भूमिका वकील मांडणार. त्यांनी त्यांच्या काळात जेवढे वकील ठेवले होते ते तसेच ठेवले, शिवाय त्यात अजून काही दिले. जास्त चांगल्या पद्दतीने प्रकरण मांडता यावं यासाठीच हे केलं. आता जर कोणाला राजकारणच करायचं असेल आणि गैरसमज पसरवायचे असतील तर त्याला कोणी थांबवू शकत नाही. पण आमची भूमिका स्पष्ट आहे. जसं आपल्या मुंबई हायकोर्टात ग्राह्य धरलं तसंच तिथं ते धरलं जावं म्हणून आम्ही मोठ्या खंडपीठाकडे गेलो”.
“प्रकरण सर्वोच्च नायायालयात असताना राज्य सरकारला कोणी प्रश्न विचारु शकतं का? आरक्षणाचा मुद्दा सोडून बाकीच्या प्रश्नांवर सरकार कधीही चर्चा करण्यास तयार आहे. मुख्यमंत्री, अशोक चव्हाण अशा काही मान्यवरांच्या उपस्थितीत चर्चा झाल्यानंतर संभाजीराजे यांनी स्वत: बाहेर येऊन चर्चा सकारात्मक झाल्याचं सांगितलं होतं,” अशी माहिती अजित पवार यांनी दिली. “विरोधकांकडे दुसरा कोणता मुद्दा राहिलेला नाही. विधान परिषदेत झालेला दारुण पराभव त्यांना असह्य करत आहे. लक्ष विचलित करण्यासाठी देशाच्या शेतकऱ्यांचा प्रश्न महत्वाचं आहे. केंद्र सरकार गांभीर्यानं घेत नाही. उलट भाजपा नेते पाकिस्तान, चीनचं नाव घेत बदनानी करत आहेत. जर तसं कोणी करत असेल तर शेतकरी त्यांचा विचार करणार नाहीत. शेतकऱ्यांची भूमिका रास्त आहे. नुसतंच चर्चेतं गुऱ्हाळ सुरु आहे,” अशी टीका यावेळी त्यांनी केली. “मंत्र्यांच्या बंगल्यांवर ९० कोटी खर्च झालेले नाहीत. मी माहिती घेतली, काहीही बातम्या दिल्या जातात. अजून आकडेच पुढे आलेले नाहीत तर ९० चा आकडा कुठून काढला?,” असा सवाल अजित पवार यांनी विचारला आहे.