मेलबर्न – ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील उर्वरित तीन सामन्यांसाठी बदली कर्णधार अजिंक्य रहाणेने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला यावे, असा सल्ला माजी कसोटीपटू गौतम गंभीरने दिला आहे.
विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. अजिंक्यने कोहलीच्या अनुपस्थितीत चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करावी. जर लोकेश राहुल व शुभमन गिल यांना संधी दिली तर त्यांना पाचव्या व सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करायला पाठवायला हवे. फलंदाजीमध्ये चौथे स्थान हे फार महत्त्वाचे असते. त्यामुळे या क्रमांकावर रहाणे फलंदाजीला आला तरच अन्य फलंदाजांनाही आत्मविश्वास मिळेल. उर्वरित कसोटी सामन्यात भारतीय संघाने पाच गोलंदाजांसह खेळायला हवे. त्यामध्ये रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यासारखे दोन अनुभवी फिरकीपटू असायला हवेत आणि त्याचबरोबर तीन वेगवान गोलंदाजांना संधी द्यायला हवी. जर अशी रचना संघात करण्यात आली तर नक्कीच चांगला समतोल पाहायला मिळू शकतो, असेही गंभीरने सांगितले.
भारतीय संघ सहा फलंदाजांनिशी या सामन्यात उतरू शकतो आणि आठव्या क्रमांकापर्यंत भारतीय संघाची फलंदाजी पाहायला मिळू शकते. त्यामुळे हे बदल जर संघात झाले तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो, असेही गंभीर म्हणाला.