Air Pollution – पुनावळे येथील श्री राम मंदिर परिसरात सुरू असलेल्या नदी स्वच्छता मोहिमेदरम्यान गंभीर निष्काळजीपणा झाल्याची घटना समोर आली आहे. नदीतील जलपर्णी काढून स्वच्छता केली जात असताना तिची योग्य विल्हेवाट न लावता ढिगाऱ्याला आग लावण्यात आल्याने संपूर्ण परिसर धुराच्या विळख्यात सापडला. माहितीनुसार, स्वच्छता मोहिमेदरम्यान मोठ्या प्रमाणात काढलेली जलपर्णी नदीकाठी साठवून ठेवण्यात आली होती. मात्र ती वेळेत हटवली गेली नाही. परिणामी, कुजण्यास सुरुवात झालेल्या या ढिगाऱ्याला अज्ञात व्यक्तींनी आग लावली. त्यामुळे दाट धूर पसरून परिसरातील हवा प्रदूषित झाली. नागरिकांना श्वसनाचा त्रास, डोळ्यांची जळजळ व अस्वस्थता जाणवू लागली. तसेच, शेजारील शाळेतील विद्यार्थ्यांनाही याचा फटका बसला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणली. सीनियर फायरमन संभाजी अवतारे, लक्ष्मण बंडगर आणि संकेत थोरात यांच्यासह पथकाने परिस्थितीवर वेळीच नियंत्रण मिळवले. या प्रकारामुळे प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. स्वच्छतेदरम्यान काढलेल्या जलपर्णीची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे अपेक्षित असताना ती जागेवरच साठवून ठेवण्यात आल्याने हा प्रकार घडल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. जलपर्णी. आग लागली त्यावेळी सजग नागरिक विकी घुमे, करण मुळे, संतोष जामदार, प्रशांत जाधव आणि ज्येष्ठ नागरिक शिंदेकाका हे घटनास्थळी उपस्थित होते. त्यांच्या सतर्कतेमुळे ही बाब तातडीने समोर आली. या घटनेमुळे पुनावळे परिसरातील स्वच्छता मोहिमेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासन पुढे कोणती ठोस पावले उचलते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. स्वच्छतेच्या नावाखाली प्रदूषण नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, “स्वच्छतेच्या नावाखालीच प्रदूषण वाढत असेल, तर अशा मोहिमेचा नेमका उपयोग काय?” असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच, प्रशासनाने तातडीने पर्यावरणीय तपासणी करून हवा प्रदूषणाचा स्तर तपासावा आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान, भाजप युवा मोर्चा सचिव जालिंदर काटे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. असे त्यांनी नमूद केले. “स्वच्छता मोहीम हा चांगला उपक्रम असला तरी त्याच्या अंमलबजावणीत झालेला निष्काळजीपणा ही गंभीर बाब आहे. या प्रकरणाची चौकशी करुन संबंधितांवर कठोर कारवाई करावी” – जालिंदर काटे, सचिव, भाजप युवा मोर्चा