तेलंगणा भाजपा अध्यक्ष बंडी संजय कुमार यांची मागणी
तेलंगणातील कॉंग्रस नेते भाजपात येणार
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने तेलंगणा कॉंग्रेस अध्यक्ष भाजपा अध्यक्षपदी बंडी संजय कुमार यांची नियुक्ती केली आहे. या नंतर पत्रकारांशी बोलताना कुमार यांनी सांगितले की, एआयएमआयएम या संघटनेवर बंदी घालण्याची गरज आहे. कारण या संघटनेचा संबंध हिंसाचार आणि दहशतवादी असल्याचा दावा त्यांनी केला.
त्याचबरोबर आगामी काळात तेलंगणामधील कॉंग्रेस पक्ष विघटित होऊन या पक्षाचे कार्यकर्ते भाजपात सीामल होतील असा दावा त्यांनी केला. आपण हिंदुत्वासाठी लढणारे कार्यकर्ते आहोत असे खासदार असलेल्या कुमार यांनी सांगितले.
त्याचबरोबर तेलंगणामधील सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समिती हा पक्ष असाउद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वाखालील एआयएमआयएम बरोबर संगणमत करून नागरिकता सुधारणा कायद्याविरोधात हिंसाचार निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे असा दावा त्यांनी केला.
आम्ही टीआरएस आणि एआयएमआयएम दरम्यानचा संबंध दाखऊन देणारे राज्यपातळीवरील आंदोलन लवकरच हाती घेणार आहोत. ते म्हणाले की, एआयएमआयएममुळे हिंसाचार निर्माण होतो. त्यामुळे या पक्षावर बंदी घालण्याची गरज आहे.
टीआरएस सरकार तेलंगणा मध्ये केंद्र सरकारच्या विविध योजनांचे नामांतर करून जनतेची दिशाभूल करीत आहे. त्याचबरोबर निधीही इतरत्र वळवीत असल्याचे त्यांनी सांगितले. आपण हिंदुत्वासाठी लढणारे कार्यकर्ते आहोत. 2005 ते 2011 या कालावधीत हिंदुत्वासाठी झालेल्या आंदोलनात सहभागी झाल्यामुळे आपल्याला 7 वेळा कारावास सहन करावा लागला असल्याचे त्यांनी सांगितले.
असाउद्दीन ओवेसी हे संसदेत भाषण करताना दहशतवाद्यांवर कठोर टीका करतात याकडे लक्ष वेधले असता ओवेसी टीका करण्याचा केवळ अभिनय करीत असल्याचे ते म्हणाले. तेलंगणा राज्यातील कॉंग्रेस कमकुवत झालेली आहे.
या पक्षातील नेते दिशाहीन झाले आहेत. त्यामुळे आगामी काळात तेलंगणा मधील कॉंग्रेस नेते भाजपात मोठ्या प्रमाणात सामील होणार असल्याचा दावा त्यांनी केला.