Vande Mataram: केंद्रीय गृह मंत्रालयाने ‘वंदे मातरम्’ संदर्भात जारी केलेल्या नव्या मार्गदर्शक सूचनांवरून (Guidelines) राजकीय वातावरण तापले आहे. एआयएमआयएम (AIMIM) दिल्लीचे अध्यक्ष शोएब जमई यांनी या निर्णयाचा तीव्र निषेध केला असून केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. “दबाव टाकून किंवा मुसलमानांच्या मानेवर सुरी ठेवून तुम्ही त्यांच्याकडून ‘वंदे मातरम्’ म्हणवून घेऊ शकत नाही,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. ‘हुकूमशाही आणि दमनकारी वृत्तीचे प्रतीक’ – पीटीआयशी बोलताना शोएब जमई यांनी केंद्र सरकारचा हा निर्णय म्हणजे हुकूमशाही आणि दमनकारी वृत्ती असल्याचे म्हटले. ते म्हणाले की, संविधानात कुठेही ‘वंदे मातरम्’ म्हणणे घटनात्मकरीत्या अनिवार्य असल्याचे लिहिलेले नाही. “हे गाणे संविधानाचा भाग नाही आणि त्याला राष्ट्रगीताचा दर्जाही मिळालेला नाही. राष्ट्रगीताचा (जन गण मन) आम्ही सर्वजण मनापासून आदर करतो आणि त्यावर कोणताही वाद नाही. मात्र, ‘वंदे मातरम्’बाबत अनेक मुस्लिम विद्वान आणि उलेमांनी यापूर्वीच आपली भूमिका स्पष्ट केली आहे,” असे जमई यांनी नमूद केले. हे गीत इस्लाममधील एकेश्वरवादाच्या सिद्धांताच्या विरोधात असल्याने ते कोणावरही लादणे अयोग्य असल्याचे त्यांनी सांगितले. संविधानातील कलमांचा दाखला- जमई यांनी संविधानातील अनुच्छेद १५, २१ आणि २५ चा हवाला देत म्हटले की, कोणत्याही नागरिकावर अशा प्रकारची सक्ती करणे हे धार्मिक स्वातंत्र्याचे थेट उल्लंघन आहे. “भाजप आणि आरएसएसने या मुद्द्याला राजकीय प्रचाराचे साधन बनवले असून मुसलमानांविरुद्ध त्याचा शस्त्रासारखा वापर केला जात आहे. आम्ही कोणत्याही दबावापुढे झुकणार नाही,” असेही त्यांनी सांगितले. काय आहे केंद्र सरकारची नवी नियमावली? केंद्रीय गृह मंत्रालयाने सरकारी आणि अधिकृत कार्यक्रमांसाठी ‘वंदे मातरम्’बाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. पूर्ण सहा कडवी गाणे/वादन : अधिकृत कार्यक्रमांमध्ये आता वंदे मातरम् चे सर्व ६ कडवे (stanzas) गाणे किंवा वाजवणे अपेक्षित आहे. यापूर्वी सामान्यतः फक्त पहिली दोन कडवी वापरली जात होती. अधिकृत कालावधी निश्चित : गीताचा अधिकृत प्रकार ३ मिनिटे १० सेकंद इतक्या कालावधीचा निश्चित करण्यात आला आहे. राष्ट्रीय गीत आधी, राष्ट्रगीत नंतर: जर एखाद्या कार्यक्रमात वंदे मातरम् आणि जन गण मन दोन्ही सादर होत असतील, तर प्रथम वंदे मातरम् आणि त्यानंतर राष्ट्रगीत सादर करायचे आहे. उभे राहणे आवश्यक: गीत गाताना किंवा वाजवताना उपस्थितांनी आदराने उभे राहणे आवश्यक आहे. कोणत्या कार्यक्रमांत सादर करायचे : राष्ट्रपती किंवा राज्यपाल यांच्या उपस्थितीतील औपचारिक कार्यक्रम, ध्वजारोहण किंवा ध्वज आगमनाचे कार्यक्रम, सरकारी समारंभ, पुरस्कार वितरण, शासकीय व सार्वजनिक कार्यक्रम, काही ठिकाणी शाळा-महाविद्यालयांच्या अधिकृत कार्यक्रमांमध्येही याचा समावेश करण्याचे निर्देश. सिनेमागृहांमध्ये बंधनकारक नाही: सरकारने स्पष्ट केले आहे की हे नियम सिनेमागृहांसाठी लागू नाहीत. पहिल्यांदाच औपचारिक प्रोटोकॉल: वंदे मातरम् साठी राष्ट्रीय गीत म्हणून पहिल्यांदाच सविस्तर अधिकृत प्रोटोकॉल जारी करण्यात आला आहे, जेणेकरून सादरीकरणात एकसारखेपणा आणि आदर राखला जाईल.