नागपूर : राज्याने पंप स्टोरेजमध्ये ७६,११५ मेगावॅट वीजनिर्मिती क्षमतेपर्यंत मजल मारली आहे.महाराष्ट्राला पंप स्टोरेज हब बनवण्याचे लक्ष्य असून महाराष्ट्रात पंप स्टोरेज प्रकल्पांच्या उभारणीसाठी झालेल्या करारांमुळे ५,८०० मेगावॅट वीजनिर्मिती क्षमतेची वाढ होणार आहे. या प्रकल्पात २३,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक आणि ११,५०० रोजगार निर्मिती होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पश्चिम घाट उदंचन जलविद्युत प्रकल्प, कोयना टप्पा- ६ उदंचन जलविद्युत प्रकल्प आणि सरोवर उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी जलसंपदा विभाग आणि जेएसडब्लू निओ एनर्जी लि., महाजेनको रिन्यूबल एनर्जी लि.व न्यु एशियन इन्फ्रा. डेव्हलपमेंट प्रा.लि. यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आले. देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र पंप स्टोरेज क्षमतेच्या दृष्टीने देशात आघाडीवर आहे. आपल्याकडे पश्चिम घाट आणि मोठ्या धरणांची प्रणाली असल्याने पंप स्टोरेजसाठी अत्यंत अनुकूल पर्यावरण उपलब्ध आहे. केंद्र शासनाचे यात सहकार्य मिळत असून या प्रकल्पांना गती मिळणार आहे. नवीकरणीय ऊर्जेतील अस्थिरता संतुलित करण्यासाठी पंप स्टोरेज प्रकल्प मोठ्या प्रमाणात उपयुक्त ठरणार आहे. कमीत कमी वेळेत प्रकल्प पूर्ण होण्यासाठी सर्व विभाग समन्वयाने काम करतील. राज्यात उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी आतापर्यंत एकूण ५४ सामंजस्य करार करण्यात आले आहेत. या प्रकल्पामुळे ७६ हजार ११५ मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे. त्यामुळे रुपये ४.०६ लाख कोटी इतकी गुंतवणूक व १.२५ लाख मनुष्यबळ रोजगार निर्मिती होणार असल्याचे त्यांनी सांगितले.