चेन्नई : तामीळनाडूत वर्षभराने विधानसभा निवडणूक होईल. त्या निवडणुकीसाठी अण्णाद्रमुक आणि भाजप हे पक्ष पुन्हा एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अण्णाद्रमुकचे प्रमुख के.पलानीस्वामी यांनी एकत्र येण्याविषयी थेट उत्तर देण्याचे टाळल्याने संबंधित चर्चांना आणखीच खतपाणी मिळाले आहे. अण्णाद्रमुकने मागील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीआधी भाजपबरोबरची मैत्री तोडली. त्याचा फटका दोन्ही पक्षांना त्या निवडणुकीत बसला. त्यामुळे पुढील वर्षीच्या विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा एकत्र येण्याच्या उद्देशातून त्या पक्षांनी चाचपणी सुरू केल्याचे वृत्त आहे. त्याविषयीचा प्रश्न पत्रकारांनी पलानीस्वामी यांना विचारला. निवडणुकीसाठी अद्याप वर्षभराचा अवधी आहे. आताच अंदाजावर आधारित प्रश्नाचे उत्तर देता येणार नाही. आणखी सहा महिन्यांनी आघाड्यांचे चित्र स्पष्ट होईल. इतर कुठला पक्ष नव्हे; तर केवळ द्रमुक आमचा प्रमुख राजकीय प्रतिस्पर्धी आहे. द्रमुकच्या नेतृत्वाखालील आघाडीला सत्तेवरून हटवणे हेच अण्णाद्रमुकचे एकमेव लक्ष्य आहे, असे ते म्हणाले. त्यांनी भाजपशी पुन्हा मैत्री करण्याबाबत होकारार्थी किंवा नकारार्थीही उत्तर दिले नाही. त्यामुळे अण्णाद्रमुकने मैत्रीचा पर्याय खुला ठेवला असल्याचे मानले जात आहे.