AI Summit 2026 : राजधानीतील प्रगती मैदान येथील भारत मंडपम मध्ये सुरू असलेल्या जागतिक एआय इम्पॅक्ट समिटमध्ये (AI Summit 2026) शुक्रवारी दुपारी मोठा गोंधळ पाहायला मिळाला. भारतीय युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अचानक शर्टलेस होत केंद्र सरकार आणि भारत-अमेरिका व्यापार कराराविरोधात निदर्शने केली. या नाट्यमय आंदोलनामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी याप्रकरणी १० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेल्या या पाच दिवसीय हाय-प्रोफाइल परिषदेत जगभरातील राष्ट्रप्रमुख आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज सहभागी झाले आहेत. शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास काही युवक प्रदर्शनी हॉल क्रमांक ५ मध्ये घुसले. ऑनलाइन नोंदणीद्वारे क्यूआर कोड मिळवून या आंदोलकांनी आत प्रवेश मिळवला होता. सुरुवातीला स्वेटर आणि जॅकेट घातलेल्या या तरुणांनी अचानक आपले कपडे काढून शर्टलेस होत निदर्शने सुरू केली. त्यांच्या हातात असलेल्या टी-शर्ट्सवर पंतप्रधान मोदी आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची छायाचित्रे तसेच भारत-अमेरिका व्यापार करार आणि पीएम इज कॉम्प्रमाईज्ड यांसारखे वादग्रस्त घोषणांचे मजकूर छापलेले होते. भाजपची टीका भारताच्या वाढत्या जागतिक तंत्रज्ञान प्रतिमेला धक्का लावण्याचा आणि १४० कोटी भारतीयांना जागतिक स्तरावर लज्जित करण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न असल्याचे म्हणत केंद्रातील अनेक दिग्गज मंत्र्यांनी काँग्रेस आणि राहुल गांधींवर टीकेची झोड उठवली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या कृत्याचा तीव्र निषेध करताना म्हटले की, संपूर्ण जग भारत मंडपममध्ये भारताचे तंत्रज्ञान आणि नेतृत्व पाहत असताना काँग्रेसने हे लज्जास्पद कृत्य केले. राजकीय फायद्यासाठी देशाच्या प्रतिष्ठेला तिलांजली देणे ही खेदाची बाब असून, काँग्रेसने नेहमीच देशहिताऐवजी पक्षहिताला प्राधान्य दिले आहे. दुसरीकडे, वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी राहुल गांधींवर थेट निशाणा साधला. राहुल गांधींच्या अहंकारापोटी आणि नैराश्यातून हे आंदोलन झाले असून, खोट्या प्रचाराच्या आधारे ते भारताच्या विकासाची गती रोखू पाहत असल्याचा आरोप गोयल यांनी केला. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि संसदीय कार्यमंत्री किरेन रिजीजू यांनीही या आंदोलनाचा कडाडून विरोध केला. ही भाजपची निवडणूक रॅली नसून जागतिक व्यासपीठ आहे, याचे भान काँग्रेसने ठेवले नाही, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी विनाशकाले विपरीत बुद्धी असे म्हणत काँग्रेसच्या या भूमिकेवर टीका केली. पोलिसांची कारवाई दरम्यान, या गोंधळप्रकरणी दिल्ली पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत सुमारे १० जणांना ताब्यात घेऊन टिळक मार्ग पोलीस ठाण्यात नेले. या घटनेनंतर भारत मंडपम परिसरातील सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली आहे. प्रत्येक अभ्यागताची अधिक सखोल तपासणी केली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताब्यात घेतलेल्या आंदोलकांवर कायदेशीर कारवाई सुरू असून, अद्याप ओळख न पटलेल्या इतर सहभागींचा शोध घेतला जात आहे. जागतिक स्तरावरील महत्त्वाची परिषद सुरू असताना घडलेल्या या प्रकारामुळे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. युवक काँग्रेसकडून आंदोलनाचे समर्थन या आंदोलनावर जोरदार टीका होत असतानाच, युवक काँग्रेसने आपली बाजू स्पष्ट केली. लोकशाहीत शांततापूर्ण मार्गाने असहमती व्यक्त करणे हा आमचा घटनादत्त अधिकार असून, देशाच्या हितासाठीच आम्ही हा आवाज उठवला आहे, अशा शब्दांत युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब यांनी या आंदोलनाचे समर्थन केले आहे. या घटनेनंतर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात उदय भानू चिब यांनी स्पष्ट केले की, युवक काँग्रेसचा विरोध जागतिक तंत्रज्ञान परिषदेला नसून, केंद्र सरकारकडून देशाच्या हिताशी होत असलेल्या तडजोडीला आहे. आम्ही रस्त्यावर उतरलो तर आम्हाला रोखले जाते आणि समाजमाध्यमांवर आवाज उठवल्यास आयटी नियमांचा आधार घेऊन पोस्ट हटवल्या जातात. अशा परिस्थितीत तरुणांच्या मनातील संताप व्यक्त करण्यासाठी हे पाऊल उचलणे भाग होते, असे त्यांनी नमूद केले.