अहमदनगर : नेवासाकरांच्या जीवाशी खेळ ! उघड्यावर अन्न पदार्थांची विक्री ; अन्न व औषध प्रशासन विभागाचे दुर्लक्ष

नेवासा – (राजेंद्र वाघमारे) – पावसाळा ऋतू तसा आजारपणाला घेऊन येणार ऋतूच असतो. त्यातही जर योग्य ती काळजी घेतली नाही तर गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते. दरम्यान. नेवासा शहरातही अशीच समस्या निर्माण झाली आहे. शहरातील छोटे-मोठे व्यावसायिक अन्न पदार्थ विकताना योग्य ती काळजी घेत नसल्याने नेवासाकरांच्या आरोग्याशी खेळण्याचा जीवघेणा खेळ सुरु असल्याचे दिसत आहे. त्यातच अन्न आणि औषध प्रशासन विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागाने पावसाळ्यात बिघडेल्या वातावरणात तरी विशेष लक्ष घालून स्वच्छ प्रतीचे अन्न विक्री करण्यावर भर देण्यास व्यावसायिकांना सूचना द्याव्यात. काही ठिकाणी अन्न तर काही ठिकाणी औषधांमध्ये सुद्धा भेसळ होत आहे. अन्न दूषित असल्यामुळे आजाराचे प्रमाण वाढले जात आहे. तर औषधांसाठी पैसे खर्च करुनही गुण येत नसल्यामुळे याकडे अन्न व औषध प्रशासन विभागाने वेळीच लक्ष घालण्याची नितांत गरज निर्माण झालीय.
अन्न व औषध प्रशासन विभागाकडून गेल्या अनेक वर्षांपासून औषध विक्रेते आणि अन्न पदार्थ विक्रेत्यांवर जरब नसल्यामुळे सर्वकाही आलबेल असल्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने याकडे लक्ष घालून जनतेच्या आरोग्य अबधित राहण्यासाठी कायद्याचा बडगा उगारण्याची गरज निर्माण झाली असल्याचे नेवासकरांतून बोलले जात आहे.





