शंकर दुपारगुडे (प्रतिनिधी) कोपरगाव –
घरी लग्न सोहळा म्हणजे आनंदी वातावरण. लग्न पत्रिका, नवनविन दागिने- कपडे घालणे, दारी मंडप, सनई – चौघडा, बँड- बाजा, नाचगाणे, स्नेहपुर्वक एकमेकांचे स्वागत पाहुणचार, नातेवाईक-मित्र परिवारांच्या गाठीभेटी, मानपान, जेवणावळी – पंगती ही सर्व धामधुम म्हणजे लग्न सोहळा. पण लग्नसोहळ्याच्या खर्चात काटकसर करुन स्मशानभूमीत काम करणाऱ्या गरीब महिलेला आर्थिक मदत करून बोरावके परिवाराने रितीरीवाजाच्या पलीकडे जाऊन माणुसकी जपली.
गुरूवार दि. १२ मार्च रोजी हरिभाऊ निवृत्ती बोरावके यांची नात व सुनिता भगवान बोरावके यांची कन्या ऋतुजा हिचा विवाह राहता तालुक्यातील प्रविण सुखदेव नवाळे याच्याशी संपन्न झाला. या लग्न सोहळ्याची निमंत्रण पत्रिका बोरावके परिवाराने छापली नाही. प्रत्येकाकडे स्मार्टफोन असल्याने सोशल मिडियाचा योग्य उपयोग करून लग्नपत्रिका सर्वांना व्हाट्सअपवर पाठवून दिल्या. लग्नसोहळ्यातील सत्काराच्या अतिरिक्त खर्चाला फाटा देत राजेंद्र हरिभाऊ बोरावके, सचिन बोरावके, निलेश आण्णासाहेब बोरावके, नितीन बोरावके या नव्या पिढीने नव्या जगाचा नवा निर्णय घेतला. समाजातील दुर्लक्षित घटकाला मदत करण्याचा निश्चिय केला.
शहरातील अमरधाममध्ये प्रेतावरती अग्निसंस्कार करून संसाराचा गाडा चालविणाऱ्या राधाबाई शिवराम जाधव या आपल्या पतीच्या अपघाती अपंगत्वामुळे कुटूंबाची जबाबदारी स्वतः सांभाळत आहेत. या गरीब दुर्लक्षित महीलेच्या कुटुंबाला आर्थिक मदत करून त्यांच्या आनंदात बोरावके परिवाराने आपल्या लग्नसोहळ्याचा आनंद पाहिला.
हरिभाऊ बोरावके,प्रभावती बोरावके यांचे पुत्र राजेंद्र, सचिन व आण्णासाहेब बोरावके,सिंधूबाई बोरावके यांचे पुत्र निलेश, नितीन बोराके आणि नवरी ऋतुजाची आई सुनिता बोरावके यांनी स्मशानभूमीत जावून अग्निसंस्काराचे काम करणाऱ्या राधाबाई जाधव व शिवराम जाधव कुटुंबाला आर्थिक मदतीची रोख रक्कम सुपुर्द करून लग्नसोहळ्याची पुर्तता केली. बोरावके यांनी अचानक दिलेल्या आर्थीक मदतीने राधाबाई जाधव भारावून गेल्या. तर शिवराम जाधव यांनी बोरावके परिवाराचे आभार व्यक्त करताना म्हणाले की, लग्न सोहळ्यातील खर्चाला फाटा देवून एखाद्या मंदिरला मदत केल्याचे मी ऐकुण होतो, पण बोरावके हे पहीले कुटूंब आहे की त्यांनी स्मशानभूमीत काम करणाऱ्या गरीब कुटूंबाची जाणीव ठेवून आर्थिक मदत केली आहे. जर समाजातील प्रत्येकांनी असा विचार केला तर नव्या परंपरेला सुरूवात होईल. अशा आनंदाचा व समाधानाचा आशीर्वाद नवदापत्याला कायम राहील अशी भावना जाधव यांनी व्यक्त केली.
तर यावेळी राजेंद्र बोरावके म्हणाले की, नवा विचार व समाज परिवर्तनाची सुरूवात आपल्यापासुन करावी म्हणून आमच्या परिवाराने हा उपक्रम माणुसकीच्या भावनेतून राबविला आहे. इतरांच्या आनंदात आपला आनंद आहे. हीच खरी आपली संस्कृती आहे. सकारात्मक कार्य कृतीतून दाखविणे आज काळाची गरज आहे.