जालना – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (दि. 2) जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावातील मराठा आंदोलनस्थळाला भेट दिली. यावेळी त्यांनी शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. आंदोलकांची भेट घेतल्यानंतर शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. जालन्यात घडलेला हा प्रकार गंभीर असल्याचे मत यावेळी शरद पवार यांनी मांडलं.
आंदोलन शांततेने केलं पाहिजे, कोणीही कायदा हातात घेता काम नये असं आवाहन यावेळी शरद पवार यांनी केलं. मुख्यमंत्र्यांनी या आंदोलनामध्ये लक्ष घालायला हवे असं देखील पवार यावेळी म्हणाले. हा विषय आम्ही पार्लमेंटमध्ये मांडणार असल्याचे देखील यावेळी शरद पवार यांनी स्पष्ट केले.
आमचा सरकार असताना आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र कोर्टात हा निर्णय टिकू शकला नाही अशी आठवण देखील यावेळी पवारांनी करून दिली.इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता केंद्र सरकार आणि राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत लक्ष घालायला हवे असेही पवार यावेळी म्हणाले.
नेमकं काय घडलं जालन्यात
जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आक्रोश मोर्चाचं आरक्षणासाठी उपोषण सुरू होतं. तेव्हा पोलिसांनी लाठीचार्ज केला. यामुळे आंदोलनस्थळी गोंधळ उडाला. लाठीचार्जची बातमी समोर येताच राज्यभरातुन संतप्त प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली.आंदोलकांवर लाठीचार्ज करतानाचे पोलिसांचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. यावेळी आंदोलकांकडून दगडफेक झाल्याचा आरोप देखील पोलिसांकडून करण्यात आला आहे.