Sooraj Pancholi: १४ वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर सूरज पंचोली म्हणाला, ‘अर्धवट बातम्या जुन्या जखमा पुन्हा उघडतात’!
Sooraj Pancholi जिया खानच्या मृत्यूनंतर सूरज पंचोली यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणाची अनेक वर्षे चौकशी आणि न्यायालयीन सुनावणी सुरू होती. अखेर मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने उपलब्ध पुरावे, साक्षी आणि कायद्याच्या आधारे सूरज पंचोली यांची निर्दोष मुक्तता केली.

Sooraj Pancholi: बॉलिवूड अभिनेता सूरज पंचोलीने जिया खान मृत्यू प्रकरणाबाबत तब्बल १४ वर्षांनंतर पहिल्यांदाच मन मोकळं केलं आहे. न्यायालयाने या प्रकरणात त्यांची निर्दोष मुक्तता केल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत, चुकीच्या आणि अपूर्ण माहितीवर आधारित बातम्यांबद्दल नाराजी व्यक्त केली. “प्रत्येक खोटी किंवा अर्धवट हेडलाइन माझ्या जुन्या जखमा पुन्हा ताज्या करते,” असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
जिया खानच्या मृत्यूनंतर सूरज पंचोली यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणाची अनेक वर्षे चौकशी आणि न्यायालयीन सुनावणी सुरू होती. अखेर मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने उपलब्ध पुरावे, साक्षी आणि कायद्याच्या आधारे सूरज पंचोली यांची निर्दोष मुक्तता केली.
निर्णयानंतर प्रथमच त्यांनी सोशल मीडियावर सविस्तर पोस्ट लिहिली. त्यांनी माध्यमे आणि सोशल मीडिया पेजेसना जबाबदारीने बातम्या देण्याचे आवाहन केले. न्यायालयाचा निर्णय आल्यानंतरही काही ठिकाणी अपूर्ण किंवा दिशाभूल करणारी माहिती प्रसारित होत असल्याचे त्यांनी नमूद केले. अशा बातम्यांमुळे त्यांच्याबद्दल चुकीची प्रतिमा तयार होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
सूरज पंचोली यांनी लिहिले की, गेली १४ वर्षे त्यांनी न्यायालयीन लढा दिला. न्यायालयाने सर्व पुरावे आणि कायदेशीर बाबींचा विचार करून त्यांना निर्दोष ठरवले आहे. त्यामुळे आता या प्रकरणात कोणताही कायदेशीर प्रश्न शिल्लक राहिलेला नाही. तरीही काही जण अजूनही त्यांच्याकडे आरोपी म्हणून पाहतात, ही बाब त्यांच्यासाठी अत्यंत वेदनादायी असल्याचे त्यांनी म्हटले.

Sooraj Pancholi
या घटनेच्या वेळी ते केवळ २० वर्षांचे होते, असेही त्यांनी सांगितले. जिया खानची त्यांच्याशी काही महिन्यांपूर्वीच ओळख झाली होती. त्या काळात एखादी व्यक्ती मानसिक आणि भावनिकदृष्ट्या कोणत्या संघर्षातून जात आहे, याची जाणीव होण्याइतकी परिपक्वता स्वतःमध्ये नव्हती, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र या एका घटनेने त्यांचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले.
त्यांनी पुढे लिहिले की, ज्या काळात स्वतःच्या करिअरवर आणि भविष्यात लक्ष केंद्रित करायला हवे होते, त्या काळात ते न्यायालयात स्वतःची निर्दोषता सिद्ध करण्यासाठी झगडत होते. या प्रदीर्घ कायदेशीर प्रक्रियेमुळे त्यांच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाची वर्षे निघून गेली. या संघर्षाचा मानसिक आणि व्यावसायिक परिणामही त्यांना सहन करावा लागल्याचे त्यांनी सांगितले.
सूरज पंचोली यांनी जिया खानच्या खासगी आयुष्याबाबतही भूमिका स्पष्ट केली. जियाने विश्वासाने सांगितलेल्या वैयक्तिक गोष्टी त्यांनी कधीही सार्वजनिकपणे उघड केल्या नाहीत. तिच्या गोपनीयतेचा त्यांनी नेहमीच आदर केला असून, त्याचप्रमाणे स्वतःलाही न्याय आणि सन्मान मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
आपल्या पोस्टच्या शेवटी त्यांनी माध्यमे आणि कंटेंट क्रिएटर्सना एक महत्त्वाचे आवाहन केले. “ही घटना अनेकांसाठी फक्त एक बातमी असू शकते, पण माझ्यासाठी हा आयुष्यातील सर्वात कठीण काळ होता. त्यामुळे माझ्याबद्दल बातमी देताना कृपया संपूर्ण सत्य आणि न्यायालयीन तथ्यांसह ती मांडावी,” असे त्यांनी नमूद केले.
सूरज पंचोली यांच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी त्यांच्या भावनांना पाठिंबा दिला असून, न्यायालयीन निर्णयाचा आदर करण्याची गरज व्यक्त केली आहे. तर काहींनी माध्यमांनी जबाबदारीने आणि पडताळणी करूनच बातम्या प्रकाशित कराव्यात, असे मत मांडले आहे.





