Afghanistan – Pakistan ceasefire: अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमावादात तात्पुरता युद्धविराम; दोन्ही देशांचे परस्परविरोधी दावे

काबुल / इस्लामाबाद – सीमावरील रक्तरंजित संघर्षानंतर अखेर अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांनी बुधवारी संध्याकाळी युद्धविरामाची घोषणा केली. मात्र, या युद्धविरामाची मागणी नेमकी कोणी केली याबाबत दोन्ही देशांचे दावे परस्परविरोधी आहेत.
अफगाणिस्तानातील तालिबान सरकारचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले की, “पाकिस्तानच्या विनंतीवरून आणि आग्रहानुसार आज सायंकाळी 5.30 नंतर युद्धविराम लागू करण्यात येणार आहे.” अफगाण संरक्षण दलांना या वेळेनंतर युद्धविरामाचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दुसरीकडे, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हा युद्धविराम अफगाणिस्तानच्या विनंतीवर सुरू करण्यात आला असून, दोन्ही देशांनी संवादातून मतभेद सोडविण्याचे मान्य केले आहे.
दरम्यान, पाकिस्तानच्या सैन्याने “तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) च्या नेतृत्व केंद्रावर” अफगाणिस्तानात हवाई हल्ला केल्याचा दावा केला आहे. मात्र, अफगाण प्रशासनाने हा दावा फेटाळून लावत शांतता आणि सार्वभौमत्वाचा आदर राखण्याचे आवाहन केले आहे.

अफगाण माध्यमांच्या माहितीनुसार, अफगाण सैन्याने बुधवारी सकाळी पाकिस्तानकडील स्पिन बोलदक गेट ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे. स्थानिक सूत्रांच्या मते, या चकमकीत पाकिस्तानी सैन्याला मोठे नुकसान झाले असून, अतिरिक्त फौजा घटनास्थळी पाठविण्यात आल्या आहेत.
कंदहारमधील स्पिन बोलदक जिल्ह्यात पाकिस्तानी सैन्याच्या हल्ल्यात किमान 12 नागरिक ठार तर 100 हून अधिक जखमी झाल्याची माहिती अफगाण सरकारने दिली आहे. या हल्ल्यानंतर अफगाण दलांनी “प्रतिहल्ला” करत पाकिस्तानला मोठे नुकसान केल्याचा दावा केला आहे.
दोन्ही देशांमधील संघर्षाची मूळ कारणे अजूनही तीच आहेत – पाकिस्तानचा आरोप आहे की अफगाणिस्तानातील तालिबान शासन TTP दहशतवाद्यांना आश्रय देते, तर अफगाणिस्तानचा दावा आहे की पाकिस्तान सातत्याने सीमारेषा ओलांडून हल्ले करतो आणि त्यांच्या भूभागावर गोळीबार करतो.
संयुक्त राष्ट्राने या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करत दोन्ही देशांना तणाव कमी करण्याचे आणि शांततामय मार्गाने तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, भारत भेटीदरम्यान अफगाण परराष्ट्रमंत्री आमिर खान मुत्ताकी यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले होते की, “अफगाणिस्तानला कोणत्याही देशाशी संघर्ष नको आहे. आमचे इतर पाच शेजारी देश आमच्याशी समाधानी आहेत.” मात्र, त्याच वेळी त्यांनी पाकिस्तानला इशारा देत म्हटले होते की, “जर पाकिस्तानला शांतता नको असेल, तर आमच्याकडे इतर पर्यायही आहेत.”
सीमेवरील हिंसाचारात गेल्या आठवड्यात दोन्ही देशांच्या सैनिकांसह शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला असून, सध्या जाहीर केलेला 48 तासांचा युद्धविराम हा संघर्ष थांबविण्यासाठीची पहिली पायरी मानली जात आहे.

