आळंदी : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या यंदाच्या आषाढी वारी पायी पालखी सोहळ्याच्या प्रमुखपदी पुण्यातील ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. राजेंद्र बाबूराव उमाप यांची निवड करण्यात आली आहे. माऊली देवस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे यांनी संस्थान कमिटीच्या बैठकीनंतर ही घोषणा केली. यावेळी विश्वस्त चैतन्य महाराज कबीर, पुरुषोत्तम महाराज पाटील, ॲड. रोहिणी पवार आणि व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर उपस्थित होते. पालखीचे प्रस्थान ८ जुलै रोजी होणार असून, २५ जुलै रोजी पंढरपुरात आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा रंगणार आहे. ॲड. उमाप यांनी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे अध्यक्षपद भूषवले असून, त्यांना संस्थानच्या प्रमुख विश्वस्तपदाचाही अनुभव आहे. सोहळाप्रमुख म्हणून निवड झाल्यानंतर, त्यांनी लाखो वारकऱ्यांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी प्रशासनाशी समन्वय ठेवून सोहळा शिस्तीत पार पाडण्याचे आश्वासन दिले. परतीच्या प्रवासापर्यंत भाविकांच्या सोयी-सुविधांची विशेष काळजी घेतली जाईल, असेही त्यांनी नमूद केले. हेही वाचा : Pune weather : पुण्याचा पारा २ अंशांनी उतरला; उपनगरांतील काही भागात ढगाळ वातावरण