मुंबई – आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. नवीन शिंदे फडणवीस सरकारचं हे पहिलच अधिवेशन असल्यामुळे सर्वसामान्यांच्या नजरा आता सरकारकडे लागल्या आहेत. यादरम्यान जे मंत्रिमंडळ झालेलं आहे त्यात आता खरा मुख्यमंत्री कोण हे सगळ्यांना समजलं असल्याचा टोला युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी नाव न घेता शिंदे गटाला लगावला आहे. अधिवेशनादरम्यान आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधत नव्या मंत्रिमंडळाबाबत भाष्य केलं. जे अपक्ष या नव्या सरकारसोबत गेले आहेत त्यांना कोठेही स्थान मिळालेले नाही. सत्ताधारी पक्षातील अनेक काम करणाऱ्या चांगल्या महिला आहेत त्यांना स्थान मिळालेलं नाही,मुंबईकरांना स्थान मिळालेलं नाही. ना मुंबईकरांचा आवाज ऐकलाय ना महिलांचा आवाज ऐकलाय ना अपक्षांना कुठेही त्यात आवाज आहे. खरं जर आपण पाहिला तर पहिल्या १४.. १५ मध्ये जे निष्ठावंत त्यांच्यासोबत गेलेले होते त्यांना देखील स्थान नाही म्हणजेच त्यांनी दाखवून दिल आहे की त्यांच्या मनात निष्ठेला कोणतेही स्थान नाही असा शाब्दिक हल्ला यावेळी आदित्य ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर केला. विधानसभेसह विधानपरिषदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरवात झाली. विधानसभेत राष्ट्रपतींसह उपराष्ट्रपतींच्या अभिनंदन प्रस्तावावर भाषणे झाली. विधान परिषदेत मात्र याआधी कधीही न पाहायला मिळालेले ऐतिहासिक चित्र दिसून आले. मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे हे देखील शिवसेनेचे आहेत आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते असलेले अंबादास दानवे हे देखील शिवसेनेचे आहेत. सध्याच्या राजकीय पेचामुळे एकाच पक्षातील दोन नेते एकमेकांसमोर उभे असल्याचे चित्र दिसून आले.