मुंबई : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची येत्या 18 जुलैपासून म्हणजेच गुरूवारपासून जनआशीर्वाद यात्रेला सुरूवात होणार आहे. राज्यातील प्रत्येक तालुक्यात ही यात्रा पोहोचणार असून, गुरुवार 18 जुलै रोजी जळगाव येथून पहिल्या टप्प्यातील यात्रेला सुरुवात होणार आहे. याविषयीची माहिती युवासेनेचे चिटणीस वरुण सरदेसाई यांनी दिली.
शिवसेना भवन येथील पत्रकार परिषदेत जनसंवाद यात्रेच्या पहिल्या टप्प्याची माहिती देण्यात आली. 18 जुलैला जळगाव येथून यात्रेला सुरुवात होईल. त्यानंतर 18 तारखेला धुळे आणि मालेगाव, 20 रोजी नाशिक शहर, 21 तारखेला नाशिक ग्रामीण आणि नगर जिल्ह्यातील काही भाग, तर 22 तारखेला श्रीरामपूर आणि शिर्डीत या जनआशीर्वाद यात्रेचा पहिला टप्पा पूर्ण होईल, असे सरदेसाई यांनी सांगितले. जनआशीर्वादच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आणि जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघापर्यंत पोहोचण्याचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.