मुंबई (भिवंडी) – माजी मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे सध्या शिवसैनिकांशी संवाद साधताहेत. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहेत. जे गेले त्यांच्या रक्तात शिवसेना कधीच नव्हती, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांवर निशाणा साधला आहे. भिवंडीमध्ये शिवसैनिकांशी संवाद साधताना त्यांनी बंडखोरांचा चांगलाच समाचार घेतला.
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आदित्य ठाकरे राज्यभरातील शिवसैनिकांशी संवाद साधत आहेत. आज त्यांनी भिवंडीतील विविध पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. हे सरकार लवकरच कोसळणार असल्याचे भाकीतही यावेळी आदित्य ठाकरेंनी केले.थोडी लाज असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या असं आव्हान देखील यावेळी ठाकरेंनी बंडखोर आमदारानं दिले.
बंडखोर आंदरांबाबत बोलताना आदित्य ठाकरे चांगलेच आक्रमक झाल्याचे यावेळी पाहायला मिळाले. शिवसैनिकांना धमक्या दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप देखील आदित्य ठाकरेंनी यावेळी केला. तसेच उद्धव ठाकरे आजारी असताना बंडाची तयारी झाली असल्याचेही आदित्य ठाकरेंनी सांगितले. पक्षात पडलेल्या फुटीनंतर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आदित्य ठाकरे सध्या चांगलेच ऍक्टिव्ह झाल्याचे पाहायला मिळाले.