मुंबई – राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे. भाजपाचे नुकसान होऊ नये म्हणून आम्ही आजपर्यंत राज्याबाहेर इतर ठिकाणी उमेदवार उभे केले नाहीत, असा दावा आदित्य ठाकरेंनी केला होता. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, आदित्य ठाकरेंना इतिहास माहिती नाही. याआधी भाजपा सोबत असताना पूर्ण ताकदीनिशी शिवसेना गोव्यात उतरली होती. पण गोव्याने प्रत्येक वेळी शिवसेनेला नाकारले. अशी कोणती निवडणूक आहे जिथे भाजपा लढतेय म्हणून ते लढले नाहीत? गेली अनेक वर्ष हे लोक लढत आहेत. पण त्यांचे डिपॉझिट कधीच वाचत नाही. इतिहास विसरून हे लोक बोलतात, अशी टिप्पणी फडणवीस यांनी केली.
आदित्य ठाकरे यांनी शनिवारी पणजीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये भाजपावर परखड शब्दांमध्ये टीका केली होती. भाजपाने पाठीत खंजीर खुपसला असे म्हणतानाच आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेने भाजपासाठी आत्तापर्यंत महाराष्ट्राबाहेर उमेदवार उभे केले नव्हते, असा देखील दावा केला. यानंतर सेना-भाजपामध्ये पुन्हा एकदा सुंदोपसुंदी सुरू झाली आहे. गेल्या वेळी उत्तर प्रदेशची देखील आठवण करून दिली. राम जन्मभूमीच्या आंदोलनानंतर उत्तर प्रदेशमध्ये हे लढले होते. एका जागेवर देखील डिपॉझिट वाचवू शकले नाहीत.
उलट मित्रपक्ष असूनही भाजपाला जिथे जिथे नुकसान पोहोचवता येईल तो प्रत्येक वेळी प्रयत्न शिवसेनेने केला. पण ते कधीही यशस्वी झाले नाहीत, असा देखील आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला.महाराष्ट्रात सगळ्यांनी बघितले आहे की भाजपासोबत युतीमध्ये शिवसेना निवडून आली. भाजपाच्या स्टेजवर मोदींनी घोषणा केली भाजपाच्या मुख्यमंत्र्यांची. त्याला तुम्ही समर्थन दिले. तुमच्या सगळ्या लोकांनी मोदींचा फोटो लावून लावून मते मागितली. त्यानंतर केवळ मुख्यमंत्रीपदासाठी तुम्ही युतीधर्म मोडला आणि विरोधकांसोबत गेले. राज्याच्या जनतेला नीट माहिती आहे की कुणी कुणाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, असे देखील फडणवीस म्हणाले.