नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरमधील एका मशिदीत लोकांना “भारत माता की जय’ आणि “जय श्रीराम’ म्हणण्यास भाग पाडल्याच्या आरोपाखाली एका सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्याला कर्तव्यावरून हटवण्यात आले आहे. ही घटना शनिवारी सकाळी पुलवामा जिल्ह्यातील झाडूरा गावात घडली. या घटनेबाबत जम्मू-काश्मीरच्या तीन माजी मुख्यमंत्र्यांसह गुलाम नबी आझाद, ओमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांनी या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
या घटनेबाबत अद्यापपर्यंत लष्कर किंवा पोलिसांकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही. लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कठोर शिक्षेचे आश्वासन दिले आहे. घोषणाबाजी करण्यासाठी जवानांनी मारहाण केल्याचा आरोप काही ग्रामस्थांनी केला आहे. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ही घटना शनिवारी सकाळी मशिदीतून अजान दिली जात असताना घडली.
त्यांचा आरोप आहे की मौलवींना अजानच्या मध्येच थांबवण्यात आले आणि त्याच्यासोबत इतर गावकऱ्यांनाही घोषणाबाजी करण्यास भाग पाडले. लष्कराच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, केवळ एक गोष्ट नक्की आहे की मशिदीबाहेरील लोकांना “भारत माता की जय’ म्हणण्यास सांगण्यात आले होते. ज्या अधिकाऱ्यावर हा आरोप करण्यात आला आहे, त्याला सध्या त्या भागातून इतरत्र हलवण्यात आले आहे, तसेच त्याला कोणत्याही ऑपरेशनल ड्युटीवरूनही काढून टाकण्यात आले आहे.
आता या घटनेवर राजकीय प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट केले की, पुलवामा येथील जदूरा येथील मशिदीत सुरक्षा दलाचे जवान घुसल्याची बातमी अतिशय अस्वस्थ करणारी आहे. ते आत घुसले हे खूपच वाईट आहे पण नंतर स्थानिक लोकांनी सांगितल्याप्रमाणे लोकांना ‘जय श्री राम’ सारख्या घोषणा देण्यास भाग पाडणे हे कुठेही मान्य नाही. मला आशा आहे की, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या प्रकरणाची कालबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने चौकशी करतील.