Abu Salem : पोर्तुगालहून प्रत्यार्पणाच्या अटींनुसार भारतात २५ वर्षे तुरुंगवास भोगल्याचा दावा करत सुटकेसाठी केलेली अबू सालेम (Abu Salem) याची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळली आहे. जर चांगल्या वर्तणुकीबद्दल शिक्षेत सूट समाविष्ट केली, तर माझी २५ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा पूर्ण झाली आहे. त्यामुळे मला सोडले पाहिजे, असे आपल्या याचिकेत सालेमने (Abu Salem) म्हटले होते. न्यायमूर्ती ए. एस. गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाटा यांच्या खंडपीठाने नमूद केले की, २५ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा पूर्ण झाली आहे असे आम्ही मानू शकत नाही. कारण शिक्षेतील सवलतीच्या मुद्द्यावर या टप्प्यावर काहीही बोलणे घाईचे ठरेल. Abu Salem न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालाचा आधार घेत म्हटले की कैद्याच्या शिक्षेतील सवलतीची गणना अर्जदाराच्या सुटकेच्या एक महिना आधी करणे आवश्यक आहे. त्यामुळे, सालेमने (Abu Salem) दाखल केलेली ही याचिका फेटाळण्यात येत आहे, असे न्यायालयाने नमूद केले. दरम्यान, सालेमला १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.