– हिमांशू
जेव्हा करिअर ऑप्शन अगदी मर्यादित होते, जेव्हा इयत्ता दहावी आणि बारावीची गुणवत्तायादी प्रसिद्ध होत होती, तेव्हा बोर्डात येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती पेपरात छापून येत असत. “पुढे कोण होणार,’ हा प्रश्न या “टॉप-50′ विद्यार्थ्यांना हमखास विचारला जायचा आणि 25 विद्यार्थी “डॉक्टर’ तर 25 विद्यार्थी “इंजिनिअर’ असं उत्तर द्यायचे. त्यांना मेडिकल किंवा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेशही सहज मिळायचा. कालांतरानं बोर्डाची गुणवत्ता यादी बंद झाली आणि सगळ्याच ज्ञानशाखांमध्ये गर्दी वाढली. मग मेडिकलसाठी “नीट’ आणि इंजिनिअरिंगसाठी “जेईई’ नावानं प्रवेश परीक्षा सुरू झाल्या. या दोन्ही शाखांमधील अभ्यासाची व्याप्ती विचारात घेता सामान्य कुवतीचे विद्यार्थी या परीक्षांच्या वाटेला जातच नाहीत.
अर्थातच परीक्षेला बसलेले विद्यार्थी बऱ्यापैकी सक्षम आहेत, किमान सभ्य आहेत असं गृहित धरायला काय हरकत आहे? परंतु “नीट’ परीक्षेवेळी सांगलीत जे घडलं, त्यावरून तसं दिसत नाही. आपल्याला परीक्षेपूर्वी एका खोलीत नेण्यात आलं आणि उलटे कपडे घालून परीक्षा हॉलमध्ये यायला सांगितलं गेलं, अशी तक्रार विद्यार्थ्यांनी पालकांकडे केली. परीक्षा झाल्यावर उलटे कपडे घालून बाहेर आलेली आपली मुलं पाहून पालकांनाही धक्काच बसला. परीक्षा जिथे झाली, त्या महाविद्यालयाने आपण केवळ इमारत उपलब्ध करून दिल्याचं सांगितलंय. म्हणजे अंतिम जबाबदारी नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडेच येते. निर्णय कुणाचाही असो, सक्षम विद्यार्थ्यांवर इतका अविश्वास का दाखवावा?
काळानुसार वातावरण बदलतं, मानसिकता बदलते हे खरं. काहीही करून प्रवेश मिळवण्यासाठी काही विद्यार्थी शॉर्टकटचा वापर करण्याची शक्यता नाकारता येत नाही हेही खरं; पण म्हणून सर्वच विद्यार्थ्यांची मानसिकता परीक्षा सुरू होण्यापूर्वी बिघडवण्याची खरोखर गरज आहे का? कुणी कॉपी करत असेल, तर संबंधिताला शोधून काढण्याचे अन्य मार्गच नाहीत का? वैद्यकीय शाखा असो वा अभियांत्रिकी, संपूर्ण देशभरात एकच प्रवेश पद्धती आहे आणि परीक्षाही सारखीच आहे. देशाच्या इतर भागांतही कॉपी रोखण्यासाठी विद्यार्थ्यांना विशेषतः विद्यार्थिनींना लज्जित व्हावं लागेल, असे “उपाय’ योजले गेल्याच्या तक्रारी आहेत. महिला आयोगानं या प्रकाराची गंभीर दखलही घेतलीय. पालकांच्या सार्वत्रिक नाराजीनंतर आगामी काळात सुधारणेची अपेक्षा आहेच;
शिवाय जिथं काळानेही हात टेकले अशा परीक्षांचं काय करायचं हाही प्रश्न आहे. उदाहरणार्थ, बिहारमधल्या बौरिसराय गावात अकरावीच्या परीक्षेवेळी जे घडलं, त्याचे व्हिडिओ समोर आलेत. ते पाहून परीक्षेचा ताण एका मिनिटात छूमंतर होईल. बिहार सरकारने स्मार्ट क्लास उपक्रमांतर्गत वर्गात लावलेल्या एलईडी टीव्हीवर भोजपुरी गाणं सुरू आहे आणि मुलं परीक्षा देत आहेत, असं व्हिडिओत दिसतं.
वर्गात परीक्षार्थींची संख्या जेमतेमच दिसतेय. उपस्थित विद्यार्थीही गाण्याचा मनमुराद आनंद घेत, हसतखेळत परीक्षा देताहेत आणि मोबाइलच्या मदतीनं बिनधास्त कॉपीही करताहेत. गमतीचा भाग म्हणजे पर्यवेक्षक, शिक्षक वर्गात दिसतच नाहीयेत. त्यातल्याच काही मुलांनी या “तणावमुक्त परीक्षे’चा व्हिडिओ व्हायरल केला आणि अभ्यास करून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची बोबडीच वळली. परीक्षांचे हे दोन नमुने समोरासमोर ठेवले तर काय दिसतं? जिथं विश्वास हवा तिथं टोकाचा अविश्वास आणि जिथं खबरदारी घ्यायला हवी तिथं आनंदीआनंद!