हिमांशू
आज काही क्षणांसाठी “फ्लॅशबॅक’मध्ये जाऊया. फार दूर नाही, 25 मार्च 2020 नंतरचे काही महिने आठवूया. दोनच वर्षांपूर्वी आपण यावेळी काय करत होतो, आठवतंय? बाजारपेठा, कार्यालयं, शाळा-कॉलेजं सगळं बंद होतं. आपण सक्तीनं घरात कैद होतो. आपल्या भोवतालचे सगळे कृत्रिम, यांत्रिक आवाज बंद पडले होते आणि फक्त नैसर्गिक आवाज ऐकू येऊ लागले होते. पशुपक्ष्यांच्या आवाजांनी अनेक वर्षांनंतर आपलं लक्ष वेधलं होतं. टीव्ही लावावा तरी रस्त्यांवरचा शुकशुकाट आणि रोज वाढत चाललेली कोविड रुग्णांची संख्या याच्याच बातम्या दिसत होत्या. डेली सोप पूर्वी कधीच न पाहिलेल्यांना कथा नेमक्या कोणत्या वळणावर आहे, काय चाललंय हेच कळत नव्हतं आणि त्यामुळे पाहून उपयोग नव्हता.
नाट्यगृहं आणि चित्रपटगृहं बंद असल्यामुळे मनोरंजनाचा तो मार्गही बंद झाला होता. मग उरला एकटा मोबाइल. ओटीटी प्लॅटफॉर्मवर वेगवेगळे कार्यक्रम पाहणं आणि ज्यांना थेट भेटता येत नाही त्यांच्याशी सोशल मीडियावरून चॅटिंग करणं. लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी चारचौघं जमले तरी त्यांच्यात थेट गप्पा होत नसत. चौघातले किमान तिघे मोबाइलच पाहत बसत. लॉकडाऊनच्या काळात सक्तीनं तेच करावं लागत होतं. त्यावेळी वाटू लागलं, कधी हे मळभ संपेल आणि कधी आपण चारचौघात बसून मनसोक्त गप्पा मारू शकू..! कधी प्रेक्षागृहात बसून नाटक-सिनेमा बघू शकू; पण…
आज खात्री पटली की, मोबाइल हा एकतर आपला “अवयव’ बनला आहे किंवा “आजार’! त्याच्यापासून मुक्ती नाही. नाटकाचा पडदा उघडला की, मराठी माणूस रोमांचित होतो. आता केवळ नाट्यप्रयोगच नव्हे तर नाट्य महोत्सवही सुरू झालेत. “कृपया आपले मोबाइल फोन बंद किंवा किमान सायलेंट मोडवर ठेवा,’ ही सूचना पुन्हा एकदा प्रत्येक नाट्यप्रयोग सुरू करताना द्यावी लागतेय. अजून किती दिवस आपण ही सूचना ऐकणार आहोत? मराठीतून बोललेलं आपल्याला कळणार आहे की नाही? परवा तर एक नाटक सुरू होण्यापूर्वी, मोबाइल “सक्तीनं’ बंद ठेवा, अशीही सूचना ऐकली. परंतु पडदा उघडल्यानंतर वीसच मिनिटांनी एक रिंगटोन वाजली. मेसेज टोन तर सतत वाजतच राहिल्या. वाटलं होतं जिवंत मनोरंजनासाठी आसूसलेला माणूस लॉकडाऊनमध्ये मोबाइलला वैतागेल आणि नाटक-चित्रपट सुरू होताच मोबाइल घरी ठेवून प्रेक्षागृहात जाईल.
पण हा अंदाज सपशेल चुकला. आपल्याकडे मोबाइलच नव्हता तो काळ अजूनही फार लांब गेलेला नाही. घरोघरी फक्त लॅंडलाइन असण्याचा तो काळ अनुभवलेली माणसं इतिहासजमा झालेली नाहीत. परंतु त्याच वयोगटातील लोकांचे मोबाइल फोन जर नाटक सुरू असताना वाजू लागले तर त्या कोडगेपणाला काय म्हणायचं..? चित्रपटगृहात जर एखाद्याचा मोबाइल वाजला (तेही चूकच) तर फक्त प्रेक्षक डिस्टर्ब होतात. परंतु नाटक सुरू असताना मोबाइल वाजला तर एकाग्रतेनं काम करणारे कलावंत विचलित होतात, तयार झालेला मूड डिस्टर्ब होतो इतकी साधी गोष्ट अजून कशी कळत नाही आपल्याला? “नाट्यगृहात मोबाइल फोन नेण्यास सक्त मनाई आहे,’ अशा पाट्या लागण्याची वाट पाहतोय का आपण? खरं तर तीच वेळ आलीये. नाटकवाल्यांनो, आता हीच मागणी लावून धरा..!