हिमांशू
हुताशनी पौर्णिमा जवळ येत असल्याच्या पार्श्वभूमीवर अखिल महाराष्ट्र चिअरलीडर नागरिक-मतदार संघटनेच्या वतीने अनोख्या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. “सर्वाधिक टोकदार वक्तव्य स्पर्धा’ असे या स्पर्धेचे नाव असून, दोन स्तरांवर आणि दोन टप्प्यांत ती घेण्यात येईल. पहिला टप्पा सोशल मीडियावरील वक्तव्यांचा असेल तर दुसरा पत्रकार परिषदा आणि खुल्या व्यासपीठांवरील वक्तव्यांचा असेल. मागील निवडणुकीत विजयी होऊन लोकप्रतिनिधी झालेल्या नेत्यांसह पराभूत नेत्यांनाही स्पर्धेत सहभाग नोंदवता येईल. ही द्विस्तरीय स्पर्धा सर्वप्रथम जिल्हा स्तरावर आणि नंतर राज्य स्तरावर खेळविली जाईल.
काही जिल्हे अधिक संवेदनशील आणि अधिक आक्रमक असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या जिल्ह्यात तीन किंवा त्याहून अधिक स्पर्धक असतील, तेथील दोन स्पर्धकांना अंतिम म्हणजे राज्य स्तरावरील स्पर्धेसाठी निवडण्यात येईल. स्पर्धेत फक्त प्रौढ (म्हणजे बौद्धिक विकास पूर्ण झालेल्या) नेत्यांनाच सहभागी होता येईल. वय झालेले नेतेही कमालीची टोकदार वक्तव्ये करू शकतात हे लक्षात घेता स्पर्धेला कमाल वयोमर्यादा असणार नाही. सर्वोत्कृष्ट विनोदी वक्तव्य, सर्वोत्कृष्ट अपशब्द, सर्वोत्कृष्ट इशारा, सर्वोत्कृष्ट धमकी, सर्वोत्कृष्ट अपमानजनक शब्द, सर्वोत्कृष्ट शायरी, सर्वोत्कृष्ट अज्ञानमूलक वक्तव्य, सर्वोत्कृष्ट थाप, सर्वोत्कृष्ट सस्पेन्स थ्रिलर, सर्वोत्कृष्ट प्रत्युत्तर, कमीत कमी शब्दांत सूचक वक्तव्य, सर्वोत्कृष्ट कुलोद्धार अशा विविध श्रेणींमध्ये लाखो मतांची बक्षिसे दिली जातील.
काही जिल्ह्यांमध्ये टोकाचे मतभेद असून, दोनपेक्षा अधिक स्पर्धकांचा आत्मसन्मान वगैरे पणाला लागला आहे, हे लक्षात घेता अशा खास जिल्ह्यांमधून दोन किंवा त्याहून अधिक नेत्यांना अंतिम फेरीत पाठविण्याचा निर्णय स्पर्धा समितीने घेतला आहे. अशा जिल्ह्यांमध्ये “बाप काढणे,’ “बापाला बाप न म्हणणे,’ असे वाक्प्रचार वापरण्याच्या क्षमतेचा आणि एकमेकांना चोर-डाकूंच्या उपमा देण्याच्या कौशल्याचा विशेषत्वाने विचार केला जाईल. “कोणाची मालमत्ता किती’ ही या स्पर्धेतील एक स्वतंत्र फेरी असून, ती जिल्हा स्तरापासून घ्यावी की थेट राज्य स्तरावरच घ्यावी, यासंबंधी आयोजकांमध्ये अद्याप विचारविनिमय सुरू असून, याबाबत लवकरच कळविले जाईल.
या फेरीत स्वपक्षीयांच्या मालमत्तांविषयी अजिबात न बोलण्याच्या कौशल्याचा प्रामुख्याने विचार केला जाईल. “टोकदार फिरस्ता’ ही या स्पर्धेतील आणखी एक स्वतंत्र श्रेणी असून, स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजे सोशल मीडियाव्यतिरिक्त केलेल्या वक्तव्यांच्या टप्प्यात जास्तीत जास्त ठिकाणच्या मतदारांचे थेट मनोरंजन करण्याची क्षमता या श्रेणीत विचारात घेतली जाईल. प्रतिस्पर्ध्याने मागणी केल्यास अपशब्दांचा अर्थ समजावून सांगणे स्पर्धकावर बंधनकारक राहील. सोशल मीडिया फेरीत स्पर्धकांच्या फॉलोअर्सची संख्या विचारात घेतली जाईल तसेच “सोशल भाषे’तील दिग्गज परीक्षण करतील. दुसऱ्या फेरीचे परीक्षण माध्यमांमधील तज्ज्ञ करतील.
परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील आणि त्याविषयी मागाहून तक्रार चालणार नाही याची स्पर्धकांनी नोंद घ्यावी. राज्यकारभार, कामे, मुद्दे, जनतेशी थेट निगडीत बाबी अधिकाधिक टाळण्याच्या कौशल्यात वाढ व्हावी, या हेतूने सदर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. मतदाराचे रूपांतर “चिअरलीडर’मध्ये करण्याची क्षमता वृद्धिंगत करण्याच्या बृहत् कार्यक्रमाचा भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत नेतेमंडळींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे.