कोरेगाव (प्रतिनिधी) – चिमणगाव (ता. कोरेगाव) येथील जरंडेश्वर शुगर मिल या खासगी साखर कारखान्यामध्ये शुक्रवारी रात्री ऊसाच्या गरम रसाच्या टाकीच्या मेन होलमधून अचानक गरम वाफ बाहेर आल्याने संभाजी शंकर घोरपडे (वय 45, रा. शिरढोण) या कामगाराचा मृत्यु झाला तर अन्य दोन कामगार गंभीर जखमी झाले. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मयत अशी नोंद करण्यात आली आहे.
जरंडेश्वर शुगर मिल या खासगी साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरु असून शुक्रवारी रात्री पावयमेदहाच्या सुमारास ऊसाच्या गरम रसाच्या टाकीच्या मेन होलमधून अचानक गरम वाफ बाहेर येण्यास सुरुवात झाली. त्यामध्ये टाकीसमोर काम करत असलेले संभाजी शंकर घोरपडे गंभीररित्या भाजले. वाफेच्या तीव्र प्रवाहामुळे ते लांब फेकले गेले आणि त्यांना जबर मार बसला.
त्यांच्यासमवेत याच विभागात काम करत असलेले अजित संजय साळुंखे (वय 24, रा. जरेवाडी) व साहिल बशीर मणेर (वय 22, रा. कुमठे) हेदेखील जखमी झाले. कारखान्याच्या मिल सेक्शनमध्ये काम करत असलेल्या अन्य कामगार, सुपरवायझर्स यांनी प्रसंगावधन राखून संभाजी घोरपडे यांना कारखान्याच्या वाहनातून सातारच्या जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, तपासणी केल्यानंतर घोरपडे यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. सातारा शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनेची माहिती घेतल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले.
अजित संजय साळुंखे व साहिल बशीर मणेर यांनादेखील तातडीने कारखान्याच्या वाहनातून कोरेगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. दोघेही 18 ते 20 टक्के भाजले असून तातडीने उपचार झाल्याने त्यांची प्रकृती सुधारत आहे. संभाजी घोरपडे यांचा मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतल्यानंतर शिरढोण येथे आणण्यात आला.
तेथे ग्रामस्थ, कारखान्याचे अधिकारी, कामगार व नातेवाइकांच्या उपस्थितीत शोकाकूल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. सातारा शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मयत अशी नोंद झाल्यानंतर हा गुन्हा तपासासाठी कोरेगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. पोलीस उपअधीक्षक गणेश किंद्रे व परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर यांनी शनिवारी कारखान्यात दुर्घटना घडलेल्या ठिकाणाची पाहणी केली. हवालदार विजय जाधव व अन्य कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.
संभाजी घोरपडे यांच्या मृत्यूने अनेकांना धक्का
संभाजी घोरपडे यांचा मृत्यू मनाला चटका लावून जाणारा ठरला. शिरढोण येथील शेतकरी कुटुंबातील घोरपडे यांनी स्वत:ला जरंडेश्वर साखर कारखान्यासाठी वाहून घेतले होते. कारखाना उभारणीवेळी भागभांडवल जमा करण्यापासून ते अहोरात्र काम करत होते. चाचणी गळीत हंगामामध्ये त्यांनी केलेल्या कार्याचा गौरवदेखील त्यावेळच्या व्यवस्थापनाने केला होता.
अत्यंत शांत व संयमी म्हणून संभाजी घोरपडे सर्वपरिचित होते. गावच्या सर्वांगीण विकासामध्ये त्यांचे योगदान होते. कारखान्यातील अन्य कामगारांबरोबर त्यांचे सलोख्याचे संबंध होते. त्यांचा मुलगा व सून पुणे येथे खासगी कंपनीमध्ये नोकरी करत असून कन्याही पुण्यात स्थायिक आहे.
काही वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचा ह्रदयविकाराने मृत्यू झाला. आपले दु:ख बाजूला सारुन ते चांगल्या प्रकारे कारखान्यात काम करत होते. त्यांच्या अचानक मृत्यूने अनेकांना धक्का बसला आहे. संपूर्ण शिरढोण गावावर शोककळा पसरली आहे.