राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय पातळीवर आपली वेगळी ओळख स्थापित करणारे शरद पवार यांचा वाढदिवस अनोख्या व विविध पद्धतीने गावपासून ते नवी दिल्लीपर्यंत साजरा केला जात आहे. भारतीय राजकारणात सलग 53 वर्ष एकदाही पराभूत न झालेले निखळ धगधगते, पुरोगामी मूल्यांना कायम समोर ठेऊन, प्रवाहाच्या विरुद्ध पोहणारे ते एक आदर्श आहेत. सत्तेसाठी मूल्यांशी कधीही तडजोड न करणारे व सर्व क्षेत्रात पारंगत अष्टपैलू राष्ट्रीय नेते म्हणून देशाला त्यांची ओळख आहे.
देशातील राजकीय सद्यस्थितीतील चित्र आज व उद्या कसे असेल, हे चार वर्षे अगोदरच ओळखून आगामी लोकसभा निवडणुकीचे गणित मांडत या वयातही तयारी 2024 साठी कार्यरत आहेत. त्यांच्या माध्यमातून भारतीय लोकशाहीचे संवर्धन, तत्वे, मूल्ये, आधुनिक तंत्रज्ञानाने शेती, उद्योजकतेला प्रोत्साहन, सामाजिक परिर्वतनाची पायाभरणीबरोबरच एक राजकीय विद्यापीठ अशी अनेक रुपे आपण अनुभवली आहेत. ते भविष्याचे रणनीतीकार, वयाला कागदोपत्री ठेवणारे चिरतरुण नेते देशात आहेत, याची प्रचीतीही भारतीयांना 53 वर्षांत आली.
खेळ, कुस्ती, क्रिकेट, शेती, औद्योगिक कारखानदारीचे अभ्यासक आणि देशाला बहुआयामी विकसित देश करण्याचे प्रयत्न सत्ता असो वा नसो, ऐंशीव्या वयातही दररोज बारा-बारा तास काम करणारे सदाबहार तरुण नेते आपल्याला लाभले आहेत. धुरंधर राजकारणी, मुत्सद्दी नेते, संघटन कौशल्यात तरबेज मात्र तेल लावलेले पैलवान आहेत, हे देशाने अनेकदा अनुभवले आहे.
राज्यात महाविकास आघाडीची स्थापना करत, त्यांनी प्रवाहाविरुद्ध राजकीय क्षमतेचा साक्ष देशाला पटवून दिली. आता या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले आहे. राजधानी दिल्लीत सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवित, या माजी केंद्रीयकृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांची बाजू केंद्र सरकारसमोर मांडली आहे. देश पातळीवरील राजकीय वातावरणाला कलाटणी देण्यासाठी प्रमुख राजकीय समविचारी पक्षांशी मोट बांधणी सुरु झाली असून, हिच आगामी लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम ठरते की काय? याकडे देशाचे व आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष शरद पवार यांनी स्वत:कडे वेधले आहे.
प्रेरणादायक कार्य
शरद पवार हे लोकांना आपल्याकडे खेचून घेणारे मॅग्नॅटिक पर्सनॅलिटी आहेत. माझ्या वैयक्तिक जीवनात मी वयाच्या 28 व्या वर्षी शरद पवारसाहेबांचे सामाजिक व राजकीय कार्य पाहून एस कॉंग्रेसमध्ये सक्रिय सदस्य होऊन राजकीय जीवनाला सुरुवात केली. या काळात शरद पवार साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यामुळे माझा त्यांच्याशी अनेकदा संपर्क आला व सार्वजनिक कामांमुळे तो वाढला. सन 1989 मध्ये (कै.) राजीव गांधी हे पंतप्रधान असताना, नवी दिल्ली इंदिरा गांधी स्टेडियम येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय सरपंच मेळाव्यात मला राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली.
या मेळाव्यानंतर भारत सरकारने सन 1992 नंतर पंचायतराज बिल संसदेने पारित केले. आज जो खरा ग्रामविकास खेड्यात शहरासारखा दिसतो हा शरद पवार व राजीव गांधी यांच्या दूरदृष्टीचाच परिणाम आहे. आज मी राजकारणा बाहेरील उद्योगक्षेत्रात, तसेच कर कायदे व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे.
राजकीय जीवनात मी माझ्या रिहे या मूळगावाचा सात वर्षे सरपंच होतो. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि त्यांचेच अनुकरण केल्याने मी आदर्श सरपंच आणि माझे गाव आदर्श ग्रामपंचायतीचा पुरस्कार पटकवू शकलो. त्यांना आदर्श मानून माझ्यासारखे असंख्य लोक आजही काम करत आहेत. देशाची आगामी लोकसभा 2024, या धुरंधर नेतुत्वाच्या हाती देणारा सुदिन या तरुणाचे वय 84 होताना आपण पाहाणार यात शंका नाही. शरद पवार साहेबांचे आरोग्य व बुद्धिमत्ता ही महाराष्ट्राला व यापुढे देशाला मिळाले, ही एक देणगी आहे .
शहराला मिळवून दिली विशिष्ट कार्यालये
उद्योग आणि व्यवसायाच्या निमित्ताने उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड शहरात आल्यानंतर शरद पवार यांच्या कार्य तत्परतेची चुणूक पहावयास मिळाली. उद्योगनगरी म्हणून या शहराला शरद पवार यांनीच आकार दिला होता. परंतु केंद्र आणि राज्याला हजारो कोटींचा महसूल देणाऱ्या या शहरात त्यावेळी विक्री कर आणि प्राप्ती कर कार्यालये नव्हती. त्यासाठी उद्योजक आणि कर सल्लागारांना पुण्यापर्यंत नियमित पायपीट करावी लागत असे. ही बाब घेऊन शरद पवार यांची भेट घेतली, त्यावेळी ते संरक्षण मंत्री होते. तरी देखील त्यांनी या महत्त्वपूर्ण बाबीवर लक्ष देत हा प्रश्न सोडविला आणि पिंपरी-चिंवचडला स्वत:ची विक्री कर आणि प्राप्ती कराची कार्यालये मिळाली. अशा शहराच्या अनेक समस्या शरद पवारांनी त्या-त्या वेळी सोडविल्या आहेत.