पुणे- “हवामान अभ्यासक विविध संस्थांनी पुढील वर्षी पावसाचे प्रमाण कमी असण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे पुणे महानगरपालिकेने आतापासून पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे,’ अशा सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या आहेत.
शासकीय विश्रामगृहात जायका, समान पाणीपुरवठा योजना आणि पुणे शहरातील पाणी समस्येबाबत आयोजित बैठकीत पालकमंत्री बोलत होते. बैठकीस आमदार माधुरी मिसाळ, भिमराव तापकीर, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, रवींद्र बिनवडे, विकास ढाकणे, पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर आदी उपस्थित होते.समान पाणी पुरवठा योजनेची अंमलबजावणी करताना इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्लो-मीटरमुळे निदर्शनास आलेली पाणी गळती कमी करण्यासाठी आवश्यक उपाय योजावेत. कमी पाणी मिळत असलेल्याची तक्रार असलेल्या भागात पाणीपुरवठा सुरळीत होईल, यासाठी कामे प्राधान्याने पूर्ण करावीत. पाणी टाक्यांच्या सुरक्षेची व्यवस्था करण्यात यावी, असे आदेश पाटील यांनी दिले.
समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाणी साठवण क्षमता 23 टक्क्यांपासून 33 टक्क्यापर्यंत वाढविण्यात येणार आहे. त्यासाठी 287 द.ल.लिटर क्षमतेच्या 82 नव्या टाक्या उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी 43 ची कामे पूर्ण झाली आहेत, तर 12 टाक्यांचा उपयोग सुरू करण्यात आला आहे. 21 टाक्यांची कामे सुरू आहेत. पाण्याचे ऑडिट करण्यासाठी 246 पैकी 235 इलेक्ट्रोमॅग्नेटीक फ्लो-मीटर बसवल्याचे यावेळी सांगण्यात आले.
जायका प्रकल्प वेळेत व्हावा
मैलापाणी शुद्धीकरणासाठी नवीन प्रकल्प उभारण्यासोबत अस्तित्वात असलेल्या प्रकल्पांची क्षमता वाढविण्याचा प्रयत्न करावा. कालबद्ध पद्धतीने जायका प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करावे. शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया केल्यानंतरचे पाणी औद्यागिक क्षेत्राला देऊन तेवढ्या प्रमाणात औद्योगिक कारणासाठी दिले जाणारे पाणी शहरासाठी वापरण्याच्या शक्यतेबाबत अभ्यास करावा, अशा सूचना पालकमंत्री पाटील यांनी दिल्या.