मुंबई – मराठी चित्रपटसृष्टी गाजवणारे प्रसिद्ध मराठी अभिनेते ‘रवींद्र महाजनी’ यांचं निधन झालं आहे. ते 77 वर्षांचे होते. मिळलेल्या माहितीनुसार, मावळ तालुक्यात आंबी येथील एका फ्लॅटमध्ये मृतावस्थेत ते आढळले. फ्लॅट मधून दुर्गंधी येत असल्याने लोकांनी पोलिसांना कळवले.
फ्लॅटचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता रवींद्र महाजनी मृतावस्थेत आढळले. दोन दिवसांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे. रवींद्र महाजनी हे भाड्याने फ्लॅट घेऊन एकटेच तेथे राहात होते.
दरम्यान, त्यांच्या निधनानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. या संदर्भातील एक ट्विट देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी सोशल मीडियावर शेअर केलं आहे.
ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
रवींद्र महाजनी यांनी आपला दमदार अभिनय, देखणेपण, रुबाबदार व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर मराठी चित्रपटसृष्टी गाजवली. नाटकांमधून सुरुवात करून…
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 15, 2023
“रवींद्र महाजनी यांनी आपला दमदार अभिनय, देखणेपण, रुबाबदार व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर मराठी चित्रपटसृष्टी गाजवली. नाटकांमधून सुरुवात करून महाजनी यांनी चित्रपटात केलेली आपली कारकीर्द मराठी रसिकांच्या निश्चितच लक्षात राहण्यासारखी आहे. त्यांच्या निधनाने एक गुणी अभिनेता आपल्यातून निघून गेला… ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांना भावपूर्ण श्रद्धांजली..!!’ या आशयाचे ट्विट त्यांनी केलं आहे.
रवींद्र महाजनींचा जीवनप्रवास….
रवींद्र महाजनी यांचा जन्म बेळगावमध्ये झाला. त्यांचे वडील ह. रा महाजनी हे स्वातंत्र्यसैनिक आणि पत्रकार होते. त्यांच्या निधनानंतर रवींद्र महाजनी यांच्यावर घराची जबाबदारी आली. पण त्यांनी टॅक्सी चालविण्याचा निर्णय घेतला त्यावेळी मात्र संपादकाचा मुलगा टॅक्सी चालवतो अशी त्यांच्यावर टीका झाली. यामुळे नातेवाईकांनी त्यांच्याशी संबंध तोडले होते.
मुंबईत टॅक्सी चालवून रवींद्र महाजनी अभिनय क्षेत्रात आले होते. मधुसुदन कालेलकर यांच्या ‘जाणता अजाणता’ या नाटकातून त्यांनी अभिनयाला सुरुवात केली. या नाटकातील त्यांचा अभिनय पाहून शांताराम बापूंंनी त्यांना चित्रपटात संधी दिली.
व्ही शांताराम यांच्या झुंज चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. रवींद्र महाजनींनी 1975 ते 1990 चा काळ गाजवला होता. देखण, गोंधळात गोंधळ, मुंबईचा फौजदार, लक्ष्मी, रुबाबदार, काय राव तुम्ही यासारखे त्यांचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले.