मुंबई : मुंबईमध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र लढणार असले तरी वसई-विरारमध्ये मात्र मनसेने उद्धवसेनेची साथ सोडली असून हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला टाळी दिली आहे. वसई विरारसाठी दोन्ही पक्षांनी आघाडी केल्यामुळे उद्धवसेनेला आता स्वबळावर लढावे लागणार आहे. येथील निवडणूकीत मनसेचे उमेदवार बहुजन विकास आघाडीच्या शिट्टी या चिन्हावर लढणार आहेत. दोन्ही बंधूंच्या युतीला काही दिवसांमध्येच वसई-विरारमध्ये सुरुंग लागला आहे. भाजप व शिंदेसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या उद्देश्यानेच मनसे व बविआची युती करण्यात आली आहे. मात्र भाजप व शिंदेसेनेला लढत द्यायची असेल तर मनसेला आमच्या शिट्टी चिन्हावर लढत द्यावी लागेल, अशी अट बविआकडून ठेवण्यात आली होती. ही अट राज ठाकरेंनी मान्य केली. या संदर्भात बोलताना मनसेचे ठाण्याचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव म्हणाले की, जरी त्यांनी वेगळे चिन्ह घेतले असले तरी मी त्यांच्यासोबत जाण्यास तयार आहे. आमच्याकडून चिन्हाचा विषय संपला असून आमचे पाच कार्यकर्ते जरी चिन्हबदलामुळे निवडूण येत असतील तरी काही हरकत नाही. निवडणूकीत निवडूण येणे महत्वाचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. उद्धवसेनेने देखील वेगळे लढू नये, भाजपला रोखायचे असेल तर एकत्र या, किती जागा आपण जिंकणार यापेक्षा भाजप सत्ता राखणार नाही, हे महत्त्वाचे आहे. भिवंडी, मीरा भाईंदर, कल्याण डोंबिवली सगळीकडे जागावाटप पूर्ण झाले आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढणार आहोत, काँग्रेस देखील सोबत आहे, असे जाधव म्हणाले.