15 जानेवारीला राज्यात ‘पगारी सुट्टी’ जाहीर; सरकारी, निमसरकारी तसेच खासगी कंपन्यांना लागू मुंबई, ठाणे यांसह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य सरकारने १५ जानेवारी रोजी सर्व नोकरदारांना पगारी सुट्टी जाहीर केलीय. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी आणि लोकशाही सुदृढ करण्यासाठी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने हा निर्णय घेतलाय. ही सुट्टी सरकारी, निमसरकारी तसेच खासगी कंपन्या, आयटी पार्क्स, मॉल आणि दुकानांमधील सर्व कर्मचाऱ्यांना लागू असेल. जे कर्मचारी कामाच्या निमित्ताने निवडणूक क्षेत्राबाहेर आहेत, त्यांनाही मतदानासाठी ही सवलत मिळेल. अपवादात्मक परिस्थितीत पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसल्यास, किमान २ ते ३ तासांची सवलत देणे बंधनकारक आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांवर कडक कारवाईचा इशारा सरकारने दिलाय. राज्यात महायुतीत मोठी फाटाफूट; १४ महापालिकांमध्ये भाजप-शिंदे सेना स्वतंत्र लढणार आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडालीय. जागावाटपाचा तिढा न सुटल्याने राज्यातील १४ महत्त्वाच्या महापालिकांमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची युती तुटलीय. पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, नांदेड, अमरावती, मालेगाव, अकोला, मीरा-भाईंदर, नवी मुंबई, धुळे, उल्हासनगर, सांगली, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या महापालिकांमध्ये दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहेत. स्थानिक गणिते आणि जागावाटपावरून झालेली रस्सीखेच या फाटाफुटीला कारणीभूत ठरलीय. मात्र, मुंबई आणि ठाण्यात ही युती कायम असून तिथे अजित पवार गटाला दूर ठेवण्यात आलेय. या सर्व महापालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून १६ जानेवारीला निकाल जाहीर होतील. या फुटीमुळे अनेक शहरांत आता बहुरंगी लढती पाहायला मिळणार असून मतदारांचा कौल कोणाकडे जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेय. शिक्षक भरती प्रक्रियेत मोठा बदल; आता ‘परीक्षा परिषदे’कडे जबाबदारी राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेत शालेय शिक्षण विभागाने महत्त्वपूर्ण बदल केला असून, आता ‘पवित्र पोर्टल’मार्फत होणारी भरती प्रक्रिया महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत राबवली जाणार आहे. यापूर्वी ही जबाबदारी शिक्षण आयुक्तालयाकडे होती. मात्र, प्रशासकीय कामाचा व्याप आणि भरती प्रक्रियेतील तांत्रिक गुंतागुंत लक्षात घेता, परीक्षांचे आयोजन आणि निवड प्रक्रिया एकाच स्वायत्त संस्थेकडे (परीक्षा परिषदेकडे) सोपवण्याचा निर्णय शासनाने घेतलाय. या प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ‘सुकाणू समिती’ स्थापन करण्यात आलीय. आगामी ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TET) २०२५’ पासूनची सर्व पदभरती कामे आता परीक्षा परिषदेच्या मार्गदर्शनाखाली पार पडतील. यामुळे शिक्षण आयुक्तालयाला शैक्षणिक धोरणांच्या अंमलबजावणीवर अधिक लक्ष केंद्रित करता येणार आहे. CBSE 3 मार्च रोजी होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक बदलले; इयत्ता 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षेबाबत अपडेट केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने २०२६ च्या १०वी आणि १२वीच्या बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात महत्त्वाचा बदल केलाय. प्रशासकीय कारणास्तव ३ मार्च २०२६ रोजी होणारी परीक्षा आता पुढे ढकलण्यात आलीय. सुधारित वेळापत्रकानुसार, १०वीचा ३ मार्च रोजी होणारा पेपर आता ११ मार्च २०२६ रोजी घेतला जाईल. तसेच, १२वीचा ३ मार्च रोजी नियोजित असलेला पेपर थेट १० एप्रिल २०२६ रोजी पार पडणार आहे. ३ आणि ४ मार्च रोजी होळीचा सण येत असल्याने हा बदल करण्यात आल्याचे समजते. या बदलामुळे १०वीच्या जर्मन, जपानी, एनसीसी यांसारख्या विविध भाषा विषयांच्या तारखा बदलल्यात, तर १२वीचा लीगल स्टडीजचा पेपर आता एप्रिलमध्ये होईल. बोर्डाच्या मुख्य परीक्षा १७ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून, पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी सुधारित तारखांची नोंद घ्यावी, असे आवाहन सीबीएसईने केलेय. इतर सर्व विषयांचे वेळापत्रक पूर्वीप्रमाणेच कायम राहील. मध्य प्रदेशात ‘स्मार्ट भ्रष्टाचार’, काँग्रेसचे गंभीर आरोप; AI फोटोंच्या जोरावर पटकावला ‘वॉटर अवॉर्ड’ मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्याने राष्ट्रपतींच्या हस्ते पटकावलेल्या ‘राष्ट्रीय जल पुरस्कारा’वरून मोठा राजकीय वाद निर्माण झालाय. प्रशासनाने जलसंधारणाची खोटी प्रगती दाखवण्यासाठी ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (AI) द्वारे तयार केलेल्या बनावट फोटोंचा वापर केल्याचा खळबळजनक आरोप प्रदेश काँग्रेस अध्यक्ष जीतू पटवारी यांनी केलाय. पटवारी यांच्या मते, अवघ्या २ फूट खोल खड्ड्यांना AI च्या मदतीने खोल विहिरी दाखवून सरकारी पोर्टलवर फोटो अपलोड करण्यात आले. या ‘स्मार्ट भ्रष्टाचारा’च्या जोरावर जिल्ह्याला २ कोटींचे बक्षीस मिळाले असून, भाजपने राष्ट्रपतींचीही दिशाभूल केल्याचा दावा त्यांनी केला. दुसरीकडे, प्रशासनाने हे आरोप फेटाळलेत. पोर्टलवर सव्वा लाखांहून अधिक खऱ्या कामांचे फोटो असून, केवळ २१ फोटो AI जनरेटेड आढळल्याचे जिल्हा पंचायत सीईओ नागार्जुन बी. गौडा यांनी मान्य केले. मात्र, हे फोटो केवळ प्रेरणेसाठी असून पुरस्काराचा निकष वेगळा असल्याचे स्पष्ट करत त्यांनी चौकशीचे आश्वासन दिले आहे. प्रियांका गांधींचा मुलगा रेहान वाड्राचा साखरपुडा; अवीवा बेग होणार गांधी-वाड्रा घराण्याची सून – काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा यांचा मुलगा रेहान वाड्रा लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचे संकेत मिळत आहेत. रेहानने आपली सात वर्षांपासूनची मैत्रीण अवीवा बेग हिच्याशी साखरपुडा केल्याचे वृत्त असून, या नात्याला दोन्ही कुटुंबांनी अधिकृत संमती दिलीय. रेहानने अवीवाला लग्नासाठी प्रपोज केले आणि तिने होकार दिल्यानंतर हा छोटेखानी सोहळा पार पडल्याचे समजते. २५ वर्षीय रेहान वाड्रा हा गांधी-नेहरू घराण्याच्या राजकीय वारशापेक्षा वेगळी वाट धरतोय. दून स्कूल आणि लंडनच्या ‘SOAS’ मधून शिक्षण पूर्ण केलेला रेहान सध्या एक निष्णात विजुअल आर्टिस्ट आणि फोटोग्राफर म्हणून ओळखला जातो. दुसरीकडे, त्याची होणारी पत्नी अवीवा बेग ही देखील दिल्लीतील एक प्रसिद्ध फोटोग्राफर आहे. तिने ओ.पी. जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटीमधून पत्रकारितेचे शिक्षण घेतले असून ती ‘एटेलियर ११’ या फोटोग्राफी स्टुडिओची सह-संस्थापक आहे. कलेची समान आवड असलेल्या या जोडीच्या नव्या प्रवासाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगलीय. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या घरावर ड्रोन हल्ला; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प संतापले रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या खासगी निवासावर युक्रेनने ड्रोन हल्ला केल्याचा खळबळजनक दावा रशियाने केलाय. या घटनेवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, कोणत्याही देशाच्या नेत्याच्या घराला लक्ष्य करणे चुकीचे असल्याचे म्हटलेय. रशियानुसार, युक्रेनने ९१ ड्रोनच्या सहाय्याने पुतिन यांच्या नोवगोरोड येथील निवासस्थानावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, जो रशियन हवाई दलाने उधळून लावला. ट्रम्प यांनी या हल्ल्याचा निषेध करताना म्हटले की, “पुतिन यांनी मला या हल्ल्याची माहिती दिली असून मी अत्यंत रागात आहे.” दुसरीकडे, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी हे आरोप फेटाळून लावले असून, शांतता चर्चेपूर्वी सहानुभूती मिळवण्यासाठी रशिया खोटे बोलत असल्याचे म्हटलेय. या तणावाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प दोन्ही देशांशी शांतता प्रस्थापित करण्यासाठी चर्चा करत आहेत. ८ व्या वेतन आयोगाबाबत सरकारी हालचालींना वेग; १ जानेवारीपासून नवीन पगार लागू होण्याची शक्यता कमी – वर्ष २०२५ संपत असताना ८ व्या वेतन आयोगाबाबत सरकारी हालचालींना वेग आलाय. या वर्षात सरकारने आयोगाची नियुक्ती, अध्यक्ष व सदस्यांची निवड आणि ‘Terms of Reference’ (TOR) अधिसूचित करणे अशी तीन महत्त्वाची पावले उचलली आहेत. ७ व्या वेतन आयोगाची मुदत ३१ डिसेंबर २०२५ रोजी संपत असली, तरी १ जानेवारी २०२६ पासून नवीन पगार लागू होण्याची शक्यता कमी आहे. संसदेत दिलेल्या माहितीनुसार, आयोग आपला अहवाल सादर केल्यानंतरच अंमलबजावणीचा निर्णय होईल. आयोगाला १८ महिन्यांचा वेळ दिल्याने शिफारसी २०२७ मध्ये येऊ शकतात. जरी अंमलबजावणीला उशीर झाला, तरी कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०२६ पासूनचे ‘एरियर’ मिळण्याची दाट शक्यता आहे. तोपर्यंत कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगानुसार मिळणारा महागाई भत्ता वाढ हाच मुख्य दिलासा ठरेल. अल्लू अर्जुनचा धमाका, ‘AA22XA6’ साठी डील; नेटफ्लिक्सने 600 कोटी विकत घेतले हक्क ‘पुष्पा २’ च्या दमदार यशानंतर साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन पुन्हा एकदा चर्चेत आलाय. त्याच्या आगामी ‘AA22XA6’ या चित्रपटाने रिलीजपूर्वीच भारतीय चित्रपटसृष्टीत नवा इतिहास रचलाय. रिपोर्ट्सनुसार, ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सने या चित्रपटाचे डिजिटल हक्क तब्बल ६०० कोटी रुपयांना विकत घेतलेत. भारतीय सिनेमाच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी ओटीटी डील मानली जातेय. ‘जवान‘ फेम दिग्दर्शक अतली यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य ॲक्शन चित्रपट साकारत असून, यात अल्लू अर्जुन पहिल्यांदाच दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत दीपिका पदुकोण, मृणाल ठाकूर आणि जान्हवी कपूर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हॉलिवूड स्तरावरील व्हीएफएक्स (VFX) आणि आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञांच्या जोरावर हा चित्रपट जागतिक स्तरावर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झालाय. या विक्रमी व्यवहारामुळे सिनेविश्वात मोठी खळबळ उडालीय. सुर्यकुमार यादव मला खूप मेसेज करायचा; अभिनेत्री खुशी मुखर्जीचा खळबळजनक आरोप सोशल मीडियावर आपल्या बोल्ड स्टेटमेंट्स आणि फॅशनमुळे नेहमी चर्चेत राहणारी अभिनेत्री आणि मॉडेल खुशी मुखर्जीने नुकत्याच एका मुलाखतीत भारतीय टी-20 टीमच्या कर्णधार सूर्यकुमार यादववर गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिलीय. “अनेक क्रिकेटर्स माझ्या मागे होते. सूर्यकुमार यादव मला खूप मेसेज करायचा पण आता आमचे फारसे बोलणं होत नाही असे खुशी मुखर्जीने म्हंटलेय. खुशीने केलेल्या या दाव्याने क्रिकेट आणि मनोरंजन विश्वात एकच खळबळ माजलीय. आता या प्रकरणात पुढे काय प्रतिक्रिया येतात हे पाहणे महत्वाचे आहे.