Pandharpur News : पंढरीत 20 लाखांवर भाविकांची मांदियाळी; गोपाळपुराच्या पुढे सात किमीपर्यंत दर्शनरांग
Pandharpur News : यंदा अपेक्षेपेक्षा अधिक भाविक आल्याने श्री विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनासाठीची रांग गोपाळपुराच्या पुढे तब्बल सात कि.मी.पर्यंत पोहोचली आहे.

पंढरपूर : ‘जाता पंढरीशी सुख वाटे जीवा… अवघे गर्जे पंढरपूर, चालला नामाचा गजर…’ या संतोक्तीची प्रचिती देणारा आषाढी एकादशीचा सोहळा शुक्रवारी पंढरपूरात भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे. राज्यासह परराज्यांतून आलेल्या सुमारे 20 लाखांहून अधिक भाविकांनी पंढरीनगरी गजबजून गेली असून, संतांच्या पालख्या शुक्रवारी रात्री पंढरपूरात दाखल झाल्यानंतर संपूर्ण शहर विठ्ठलनामाच्या गजराने दुमदुमून गेले आहे.
देहू, आळंदीसह विविध संतांच्या पालख्या मजल-दरमजल करत वाखरी येथे विसावल्यानंतर रिंगण, आरती, कीर्तन, भजन, भारुड आदी धार्मिक कार्यक्रमांनी भक्तिरसाची उधळण केली. यंदा यात्रेसाठी मोठ्या संख्येने वारकरी आणि भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. यंदा अपेक्षेपेक्षा अधिक भाविक आल्याने श्री विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनासाठीची रांग गोपाळपुराच्या पुढे तब्बल सात कि.मी.पर्यंत पोहोचली आहे. मंदिर परिसरातून सुरू झालेली रांग पत्राशेड, गोपाळपूरमार्गे रांझणी रस्त्यापर्यंत गेली असून, दर्शनासाठी 25 ते 30 तासांचा कालावधी लागत आहे. दर्शनरांगेत सुमारे चार लाखांहून अधिक भाविक असून, प्रतिमिनिट सुमारे 50, तर तासाला तीन हजार भाविकांना पदस्पर्श दर्शन दिले जात आहे. मुखदर्शनासाठी 5 तासाहून अधिक प्रतीक्षा करावी लागत आहे. भक्तिसागराच्या 65 एकर परिसरात, चंद्रभागा वाळवंट, प्रदक्षिणा मार्ग, भक्तिमार्ग, स्टेशन रोड तसेच शहरातील मठ, मंदिरे, भक्तनिवास आणि राहुट्यांमध्ये लाखो भाविक वास्तव्यास असून, सर्वत्र भजन, कीर्तन, प्रवचन आणि हरिनामाचा अखंड गजर सुरू आहे. शहरातील निवास व्यवस्था पूर्णपणे हाऊसफुल्ल झाली आहे.
यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाने जादा बसगाड्या सोडल्या असून, विशेष रेल्वे गाड्यांसह खासगी वाहनांतूनही मोठ्या प्रमाणात भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. शहरात विविध ठिकाणी वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रेपूर्वी चंद्रभागा नदीत मुबलक पाणी सोडण्यात आले आहे. भाविकांना स्नानाचा लाभ घेता येत आहे. नदीपात्रात सुरक्षेच्या दृष्टीने 18 स्पीड बोटी, होड्या आणि जीवरक्षक दल तैनात करण्यात आले आहे.
भाविकांच्या सुरक्षेसाठी हजारो पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात असून, शेकडो सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे संपूर्ण परिसरावर करडी नजर ठेवण्यात येत आहे. अनेक ठिकाणी तीर्थक्षेत्र पोलिस मदत केंद्रे, आपत्कालीन प्रतिसाद पथके, मदत व प्रतिसाद केंद्रे तसेच होडी नियंत्रण पथके कार्यरत आहेत. मुख्यमंत्री सुविधा केंद्रांसह आरोग्य विभागाने वाखरी, गोपाळपूर दर्शनरांग आणि 65 एकर परिसरात आरोग्य शिबिरे उभारली असून, भाविकांना औषधोपचार, निवारा व अन्य सुविधा पुरविल्या जात आहेत. यात्रेसाठी ठिकठिकाणी फिरती शौचालये तसेच महिला स्नानगृहांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
दरम्यान, आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारीच पंढरपुरात दाखल झाले असून, त्यांच्या हस्ते शनिवारी पहाटे श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा होणार आहे.




