मुंबई : राज्याचं लक्ष लागलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी (BMC Election) आज भाजप, शिवसेनेसह सर्व प्रमुख पक्षांकडून उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या इच्छुक उमेदवारांचे भवितव्य स्पष्ट झाले आहे. शिवसेना उबाठा पक्षाने यादी जाहीर न करता थेट उमेदवारांना एबी फॉर्म दिल्याने अनेक ठिकाणी नाराजीचे सूर उमटले आहेत. विशेषतः माहिम आणि वरळी (Aditya Thackeray) विधानसभा मतदारसंघातील वॉर्डांवर सर्वांचे लक्ष होते. वरळीतील वॉर्ड क्रमांक 196 महिलांसाठी खुला झाल्याने विभागप्रमुख आशिष चेंबूरकर यांच्या पत्नी पद्मजा चेंबूरकर यांना उमेदवारी देण्यात आली. तर वॉर्ड क्रमांक 194 मधून आमदार सुनील शिंदे यांचे बंधू निशिकांत शिंदे यांना तिकीट देण्यात आले. या निर्णयामुळे वरळी विधानसभा मतदारसंघात शिवसेना उबाठा गटात नाराजी उफाळून आली आहे. आकर्शिका बेकल पाटील, सूर्यकांत कोळी आणि संगीता जगताप या निष्ठावंत पदाधिकाऱ्यांची नावे उमेदवारीसाठी जोरदार चर्चेत होती. मात्र, त्यांना डावलण्यात आल्याने पक्षात असंतोष वाढल्याचे चित्र आहे. युवा सेना विभाग अधिकारी असलेल्या आकर्शिका पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरेंसाठी वरळीतील हाय-राईज इमारतींमधील मतदारांची जबाबदारी सांभाळली होती. तर संगीता जगताप या महिला शाखाप्रमुख म्हणून कार्यरत होत्या. तरीही पक्षातील नेत्यांच्या नातेवाईकांना प्राधान्य दिल्याने निष्ठावंतांवर अन्याय झाल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे. दरम्यान, या नाराजीचा फटका पक्षाला बसताना दिसत असून वरळी कोळीवाड्यातील शाखाप्रमुख सूर्यकांत कोळी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी हरीश वरळीकर आणि आशिष चेंबूरकर यांच्याविरोधात पत्र लिहून नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. तिकीटवाटपानंतर निर्माण झालेल्या या असंतोषामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेपुढे बंडखोरांचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. आदित्य ठाकरे ही नाराजी दूर करून परिस्थिती सावरतील का, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.