जळगाव : जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. जळगावचे महानगराध्यक्ष आणि प्रभावशाली नेते अभिषेक पाटील यांनी पक्षाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. महापालिका निवडणुकीत जागावाटपावरून झालेल्या मतभेदांमुळे हा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. काय आहे राजीनाम्याचे कारण? अभिषेक पाटील यांनी जिल्हाध्यक्ष संजय पवार आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासोबत जागा वाटप आणि उमेदवारीच्या मुद्द्यावरून तीव्र मतभेद झाल्याने राजीनामा दिला. जळगाव महापालिकेत राष्ट्रवादीला अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत आणि पक्षांतर्गत नेत्यांमध्ये असंतोष वाढला असल्याने हा निर्णय घेतला गेला. यामुळे अजित पवार गटमध्ये अंतर्गत दुफळी उघडकीस आली असून, निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. पक्षाकडून समजूत काढण्याचा प्रयत्न राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी तात्काळ हालचाली सुरू केल्या आहेत. अभिषेक पाटील यांच्या आई आणि महिला पदाधिकारी कल्पनाबाई पाटील यांची समजूत काढण्यासाठी जिल्हाध्यक्ष संजय पवार, माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि माजी आमदार मनीष जैन यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. “त्यांची जी काही नाराजी असेल ती लवकरात लवकर दूर करू, अभिषेक पाटील यांना परत पक्षात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असे संजय पवार यांनी सांगितले. मात्र, अभिषेक पाटील यांनी अद्याप राजीनामा मागे घेतला नसल्याने परिस्थिती तणावपूर्ण आहे. जळगावमध्ये महायुतीची घोषणा दुसरीकडे, माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी शेवटच्या क्षणी महायुतीची जळगाव महापालिकेसाठी घोषणा केली आहे. या युतीनुसार अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला ६ जागा मिळणार असून, उर्वरित जागा भाजप आणि शिवसेना लढवणार आहेत. राज्य सरकारप्रमाणे आता जळगाव महापालिकेतही महायुतीची आघाडी दिसत आहे.