पिंपरी – शहराच्या झपाट्याने वाढणाऱ्या इमारती, आयटी पार्क आणि विकासाच्या गजरामागे काही अशा काळ्या आठवणी दडल्या आहेत, ज्या आजही समाजाचे मन सुन्न करतात. निरागस बालकांवरील अपहरण, लैंगिक अत्याचार आणि निर्घृण हत्यांच्या घटना वर्षानुवर्षे नागरिकांच्या स्मरणात आहेत. मात्र, त्या निष्पाप जीवांना आजतागायत पूर्ण न्याय मिळालेला नाही, ही वस्तुस्थिती अधिक वेदनादायी आहे. फेब्रुवारी २०२४ मध्ये वाकड येथे घडलेली घटना शहराला हादरवून गेली. अवघ्या आठ वर्षांच्या मुलाचे अपहरण करून उसाच्या गाडीवर काम करणाऱ्या कामगाराने त्याला बावधन येथे नेले. अनैसर्गिक लैंगिक अत्याचारानंतर त्याचा खून करण्यात आला. उसाचा रस प्यायला देत ओळख वाढवणाऱ्या आरोपीने केलेली ही कृत्ये माणुसकीला काळिमा फासणारी ठरली. या प्रकरणात आरोपी अटक झाला, तरीही जखम अजूनही ताजी आहे. २०१८ मध्ये पिंपरी भाटनगर येथे शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने चार वर्षांच्या मुलीचे अपहरण केले. अत्याचारानंतर तिचा मृतदेह नेहरूनगर येथील एचए मैदानावर फेकून देण्यात आला. या घटनेचा आरोपीला जवळपास वर्षभरानंतर अटक करण्यात आली. मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या धक्क्याने काही महिन्यांतच तिच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला. त्या कुटुंबाचा संपूर्ण वंशच या एका गुन्ह्याने उद्ध्वस्त झाला. १३ वर्षांपूर्वी निगडी (ओटास्किम) येथे चार वर्षांच्या मुलीचे अपहरण करून पुणे–मुंबई महामार्गावरील जुन्या जकात नाक्याजवळ तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. मृतदेह सापडूनही आरोपीचा शोध आजतागायत लागलेला नाही. त्याच काळात कासारवाडी येथे गिरणीसमोर दररोज पीठ गोळा करणाऱ्या पाच वर्षांच्या मुलीचे अपहरण झाले. लैंगिक अत्याचारानंतर तिचा मृतदेह रेल्वे रुळावर फेकण्यात आला. अंगावरून रेल्वे गेल्याने तिचे शरीर चिरडले गेले. त्या दृश्याने संपूर्ण परिसर सुन्न झाला होता. नागसेननगर, चिंचवड येथे भंगार वेचकाने एका लहान मुलाला भरपूर भंगार आणि त्यातून पैसे मिळतील असे सांगून केएसबी चौकातील टाटा लेक येथे नेऊन त्याच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले. या घटनेतील आरोपी आजही पोलिसांना पकडता आला नाही. तसेच २०१८ मध्ये वाकड येथे संतोष मंगल कार्यालयाजवळ मोकळ्या जागेत ३ ते ४ वर्षांच्या मुलाचा खून करून मृतदेह पुरण्यात आला होता. जनावरांनी मृतदेह बाहेर काढल्यानंतर हा अमानुष प्रकार उघडकीस आला. या घटनेत जादूटोण्याचा संशय व्यक्त झाला होता. या घटनेतील मुलाची ओळख पटली नसल्याने आरोपीही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. या सर्व घटनांमध्ये एक समान धागा आहे — निरागस बालकांचा निघून गेलेला श्वास आणि अपूर्ण राहिलेला न्याय. काही प्रकरणांत आरोपी अटक झाले, काहींमध्ये तपास अर्धवट राहिला, तर काही गुन्ह्यांत आरोपी अजूनही सापडलेले नाहीत. वर्षे उलटून गेली, अधिकारी बदलले, फाईल्स जाड झाल्या; मात्र त्या पालकांच्या डोळ्यातील प्रश्न आजही तसाच आहे, “माझ्या मुलाला न्याय कधी?” शहर सुरक्षित असल्याचा दावा केला जातो; पण या घटना आठवल्या की तो दावा फिका पडतो. कठोर तपास, जुन्या प्रकरणांचा नव्याने आढावा, दोषींना शिक्षा आणि बालकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना, याशिवाय या जखमा भरून निघणार नाहीत. या पिडित बालकांना न्याय कधी मिळणार? हा प्रश्न केवळ त्यांच्या कुटुंबांचा नाही, तर संपूर्ण समाजाच्या अंतःकरणाला सतावणारा आहे. न्याय उशिरा मिळाला तरी चालेल; पण तो मिळायलाच हवा, कारण हरवलेले बालपण परत येणार नाही, मात्र न्याय मिळाल्यास तरी माणुसकी जिवंत असल्याचा विश्वास उरेल.