जामखेड: जामखेड तालुक्यातील चोंडी येथे पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांना आधार देण्यासाठी ‘स्वयंदीप सोशल फाउंडेशन’च्या वतीने मदतीचा उपक्रम राबवण्यात आला. २५ डिसेंबर रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमात २५० किराणा किट, २५० शालेय साहित्य संच आणि २५० साड्यांचे वाटप करण्यात आले. फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा प्रतिभा वानखडे यांनी यावेळी आपली भूमिका स्पष्ट केली. त्या म्हणाल्या, “आपत्तीच्या काळात गरजूंच्या पाठीशी उभे राहणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी संस्था सदैव कार्यरत राहील.” कार्यक्रमात सुनंदा गायकवाड यांनी संकटाच्या काळात परस्पर सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले. डॉ. बाळासाहेब सोनवणे यांनी या उपक्रमाला सामाजिक न्यायाचा महत्त्वपूर्ण टप्पा संबोधले. पुण्यात स्थायिक असूनही डॉ. सोनवणे यांनी आपल्या जन्मभूमीशी असलेले नाते जपत यापूर्वीही विविध संस्थांच्या माध्यमातून चोंडी गावाला मदत मिळवून दिली आहे. दिवाळीच्या सुट्ट्या आणि आचारसंहितेमुळे या कार्यक्रमाला विलंब झाला असला, तरी नियोजित वेळेत हा मदत सोहळा शिस्तबद्धरीत्या पार पडला. या उपक्रमासाठी प्रा. डॉ. संस्कृती सोनवणे, नीलम सोनवणे आणि माजी सरपंच अभिमान सोनवणे यांनी विशेष परिश्रम घेतले. सरपंच मालन शिंदे आणि ग्रामस्थांनी फाउंडेशनचे आभार मानले. कार्यक्रमास सचिन कुरणे, नंदाताई भालेराव, सागर मिसाळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.