दौंड -दौंड रेल्वे स्थानकातून गुरुवारी (दि. 21) दुपारी 12 वाजून 40 मिनिटांनी उत्तर प्रदेशकडे जाणाऱ्या विशेष श्रमिक रेल्वेला तहसीलदार संजय पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केली. मात्र, झेंडा दाखवत असताना उपस्थित नेते मंडळींनी सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम धाब्यावर बसवल्याचे दिसून आले, तर रेल्वेमध्ये मजुरांना बसवताना सोशल डिस्टन्सिंगचे तंतोतंत पालन करण्यात आले. मग प्रवाशांना एक अन् अधिकारी राजकारण्यांना दुसरा नियम का, असा सवाल उपस्थित होत आहे.
दौंड स्थानकातून गुरुवारी सोडण्यात आलेल्या विशेष रेल्वेला 24 डब्बे असून, यामध्ये 1101 परप्रांतीय मजूर गेले आहेत. ही रेल्वे दौंड ते मुज्जफराबाद असून ती मुज्जफराबादला शुक्रवारी (दि. 22) पोहोचणार आहे. या रेल्वेत दौंडसह पुरंदर तालुक्यातील परप्रांतीय रवाना झाले आहेत. या मजुरांना जेवणाचे पाकीट आणि पिण्याच्या पाणी बॉटल दौंड तहसील प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहेत.
पत्रकारांना मज्जाव अन् नेत्यांना पायघड्या
रेल्वेच्या विभागीय व्यवस्थपकांनी पत्रकारांना रेल्वे स्थानकात येण्यास मज्जाव केला असून, तुम्हाला कोणताही फोटो काढता येणार नाही, असे रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलिसांनी पत्रकारांना सांगितले. मात्र, दौंड तालुक्यातील व तालुक्याच्या बाहेरील एका नेत्यास पायघड्या घातल्याप्रमाणे स्थानकावर सोडले असल्याने पत्रकारांना मज्जाव आणि नेत्यांना पायघड्या, असे चित्र पाहावयास मिळाले.
नेत्यांची चमकोगिरी
दौंड रेल्वेस्थानकातून उत्तर प्रदेशसाठी सोडण्यात आलेल्या विशेष श्रमिक रेल्वेस झेंडा दाखविण्यासाठी अनेक राजकीय नेत्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. या चमकोगिरीच्या नादात या नेत्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे उल्लघंन केल्याचे त्यांच्या लक्षात ही येत नव्हते. त्यामुळे या चमकोगिरीना आवरणार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.