मुंबई – बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र यांनी काही दिवसांपूर्वीच शिर्डीच्या साईबाबांविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होते. ज्यानंतर त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. याप्रकरणी आता मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात ठाकरे गटाच्या युवा सेनेने तक्रार दाखल केली आहे.
ठाकरे गटाचे युवासेना नेते आणि शिर्डी साई संस्थानचे माजी विश्वस्त राहुल कानल यांनी तक्रार दाखल केली आहे. यात त्यांनी धीरेंद्र शास्त्री यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी धीरेंद्र शास्त्री यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.
साईबाबांबाबत धीरेंद्र शास्त्रींने काय विधान केले होते?
बागेश्वर बाबा उर्फ पंडीत धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी मध्यप्रदेशच्या जबलपूरमध्ये साईबाबांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. “साईबाबा हे देव नाहीत. साईबाबा संत आणि फकीर असू शकतात. पण देव असू शकत नाही. आपल्या धर्मात शंकराचार्यांना सर्वात मोठं स्थान आहे. त्यांनी साईबाबांना देवांचं स्थान दिलेलं नाही. कोल्ह्याची कातडी पांघरून कोणीही सिंह बनू शकतं नाही.”
“आमच्या धर्माचे शंकराचार्य यांनी साई बाबांना ईश्वराचं स्थान दिलेलं नाही. शंकराचार्य यांचं मत मानणं अनिवार्य आहे. त्यांच्या मताचं पालन करणं प्रत्येक सनातनी व्यक्तीचं कर्तव्य आहे. कारण ते धर्माचे पंतप्रधान आहेत. कोणतेही संत ते आपल्या धर्माचे असो अथवा दुसऱ्या त्यांना ईश्वराचं स्थान देता येणार नाही. कोणतेही संत ते तुलसीदास असतील, सूरदास असतील किंवा इतर कोणतेही ते केवळ महापुरुष आहेत, युगपुरूष आहेत, परंतु ते देव नाहीत,” असे विधान धीरेंद्र शास्त्री यांनी केले होते.