पुणे -पर्यावरणीय ऱ्हास लक्षात घेता मुलांना स्वच्छ, निरोगी आणि शाश्वत वातावरण मिळण्यासाठी सरकारने तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी बालहक्क आणि पर्यावरण विषयावरील राज्यस्तरीय परिषदेत आली. यावेळी पुणे जिल्हा बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा डॉ. राणी खेडीकर, नंदिता अंबिके, पर्यावरण शिक्षण केंद्राचे अवधूत अभ्यंकर, जीविधा संस्थेचे राजीव पंडित, तेरे देस होम्स जर्मनी संस्थेचे संपत मांडवे, आरोग्य हक्क परिषदेचे दीपक जाधव उपस्थित होते.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या बालहक्क संहितेमध्ये, मुलांचे हक्क पर्यावरण आणि हवामान बदलांशी कसे संबंधित आहेत आणि या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी सरकारने काय केले पाहिजे, या विषयावर संयुक्त राष्ट्रसंघाच्या बालहक्क समितीने एक डॉक्युमेंट तयार केले आहे. याला “जनरल कमेंट 26′ म्हटले गेले आहे. याबद्दल जनजागृती आणि अंमलबजावणी याबाबत चर्चा करणे अपेक्षित आहे. यासाठी बालहक्क कृती समिती, न्यू व्हिजन संस्था, तेरे देस होम्स जर्मनी, आणि बाल मजुरी विरोधी अभियान या संस्थांमार्फत परिषदेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये पुणे, औरंगाबाद, परभणी, बीड, नगर, सोलापूर या जिल्ह्यांमधील मुले, युवक, तसेच स्वयंसेवी संस्था प्रतिनिधींनी परिषदेत सहभाग घेतला.
शेतकऱ्यांच्या पाल्यांचे प्रश्न गंभीर
शेती आणि शेतीशी निगडीत काम करणाऱ्या महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांना रोजगारासाठी स्थलांतरीत व्हावे लागते. त्यामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षण आणि सर्वांगीण विकासावर परिणाम होतो. हा मुद्दादेखील परिषदेत चर्चिला गेला. शहरी भागात देखील पर्यावरणीय बदलामुळे अनेक कुटुंबे प्रभावित झाली असून, स्वच्छ आणि निरोगी वातावरणापासून मुले वंचित राहतात. शहरातील वायू आणि जल प्रदूषण समस्येकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी यावेळी उपस्थित असलेल्या मुलांनी केली.