खालापूर – मंगेश काळोखे यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ आणि आरोपींना कठोरात कठोर शिक्षा, फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी खोपोलीत सोमवारी (दि. २९) कॅन्डल मार्च काढण्यात आला. आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली साईबाबानगर येथून खोपोली पोलीस ठाण्यापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी मंगेश काळोखे यांच्या कुटुंबीयांसह हजारो नागरिक सहभागी झाले होते. कॅन्डल मार्चदरम्यान संपूर्ण परिसरात तीव्र संतापाचे वातावरण होते. मंगेश काळोखे यांना न्याय मिळालाच पाहिजे, मारेकऱ्यांना फाशी द्या, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल नेहूल पाटील यांना आंदोलकांच्या वतीने निवेदन देण्यात आले. आमदार महेंद्र थोरवे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, हत्येप्रकरणात काही आरोपींना अटक झाली असली तरी अद्यापही कटामध्ये सहभागी असलेले काही आरोपी मोकाट आहेत. जोपर्यंत सर्व आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत लढा सुरूच राहील, असा ठाम इशाराही त्यांनी दिला. मंगेश काळोखे यांच्या कुटुंबीयांकडून या हत्याकांडामागे राजकीय संबंध असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते व कार्यकर्ते या प्रकरणात सहभागी असल्याचा आरोप करत आमदार महेंद्र थोरवे यांनी काही नेत्यांची नावे घेतली. तसेच कर्जतमध्ये जाऊन संबंधित आरोपींना पाठबळ देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचाही आरोप त्यांनी केला. दरम्यान, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कॅन्डल मार्च शांततेत पार पडला असला तरी, आरोपींना तात्काळ अटक न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा आंदोलकांनी दिला.