मंत्रालयात मोठी लगबग! अडकलेल्या फाईल्स लवकर निकाली काढण्याचे प्रयत्न

मुंबई – महाराष्ट्र विधानसभा निवडणूक कधी होणार याची मोठी उत्सुकता आहे. राजकीय पक्षांप्रमाणेच मतदारांच्याही मनात निवडणुकीच्या तारखांबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. सध्या मंत्रालयामध्ये मोठी लगबग सुरू झाली आहे. विविध प्रलंबित कामे मार्गी लावण्याचे, मतदारसंघातील कामांसंदर्भात आमदार फेऱ्या मारू लागले आहेत. खासगी कामांसाठीचे प्रस्ताव सादर करणे. अडलेल्या फाइल्स लवकर मार्गी लागाव्यात यासाठी प्रयत्न करणे ही कामे मंत्रालयात वेगाने सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकांची चाहूल लागल्याने ही सगळी गडबड सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.
मंत्रालयात सुरू असलेली कुजबुजीचा कानोसा घेतला असता महाराष्ट्रात आचारसंहिता कधी लागेल याबाबत ऐकू येऊ लागले आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर स्थापन झालेले सरकार 26 नोव्हेंबरला अस्तित्वात आले होते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीनंतरचे सरकारही 26 नोव्हेंबरच्या आत स्थापन होणे गरजेचे आहे. त्यापूर्वी मतदान आणि मतमोजणी होणे गरजेचे आहे. 2019 च्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका हरियाणासोबत घेण्यात आल्या होत्या.
यंदा मात्र हरियाणाच्या निवडणुका जम्मू कश्मीरसोबत घेण्यात येत आहेत. महाराष्ट्राच्या निवडणुका वेगळ्या घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 21 सप्टेंबर 2019 ला आचारसंहिता लागू झाली होती. 21 ऑक्टोबर 2019 रोजी एकाच टप्प्यात मतदान पार पडलं होतं आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी पार पडली होती. 27 ऑक्टोबरपूर्वी निवडणुकीची सगळी प्रक्रिया पार पडणे अपेक्षित होते.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या एका भाषणात बोलताना दिवाळीनंतर निवडणुका होतील असे म्हटले होते. 8 ते 10 ऑक्टोबरदरम्यान महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. आचारसंहितेचा काळ एक महिन्याचा असतो त्यामुळे 8 ते 10 नोव्हेंबरदरम्यान मतदान होईल आणि त्यापुढे 3-4 दिवसांत मतमोजणी पार पडेल अशी शक्यता आहे.



