Nagar | भुतवडा तलावात ९० टक्के पाणीसाठा

जामखेड, (प्रतिनिधी) – तालुक्यातील भुतवडा तलावाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडत आहे. त्यामुळे या तलावांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या भुतवडा तलावातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली.
त्यामुळे जुना भुतवडा तलावात ९० टक्के व नवीन तलावात ९० टक्के पाणीसाठा झाला. प्रथमच जुलै महिन्यात जोरदार झालेल्या पावसाने दोन्ही तलाव भरण्याच्या मार्गावर आहेत. तर तालुक्यातील मोहरी, नायगाव, रत्नापूर, धोत्री हे चार तलाव शंभर टक्के ओसंडून वाहत आहेत.
जवळपास दोन ते तीन वर्षानंतर प्रथमच जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस पडत आहे. मृगातच पेरण्या झाल्या. पिकांची वाढ जोमाने सुरू आहे. तालुक्यातील मोहरी,नायगाव, रत्नापूर, धोत्री हे चारही तलाव ‘ओव्हर फ्लो’ झाले आहे. धोंडपारगाव तलावात ११ टक्के, तेलंगशी ५ टक्के, अमृतलिंग २० टक्के, पिपंळगाव आवळा ६ ० टक्के तर जवळके तलावात ० टक्के पाणीसाठा आहे.
शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या भुतवडा नवीन व जुना तलाव पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यानंतर बाकीचे तलाव भरायचे. त्यानंतर रत्नापूर तलाव भरण्यास सुरवात व्हायची. ते भरल्यानंतर अर्ध्या तालुक्याचा पाणीप्रश्न संपुष्टात यायचा. आता प्रथमच वरुणराजाने तालुका जलमय केला आहे. गेल्या दोन – तीन वर्षांनंतर नंतर जून – जुलैमध्ये समाधानकारक पाऊस झाला आहे.
पिकेही तरारली आहेत. शेती शिवारातील सर्वच लहान-मोठे बंधारे तुडुंब भरले आहेत. विहिरी व कूपनलिकांची पातळी वाढली आहे. केवळ दहा फूट दोरानेही पाणी काढता येईल, अशी स्थिती आहे. काही ठिकाणी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले असून शेतातील पाण्याचा निचरा होत नसल्याने पिके जळून चालेले असल्याचे चित्र काही गावात आहे
दरम्यान, जुलै महिन्याचा पाऊस जामखेडकरांसाठी सुखद ठरत असून शहरास पाणी पुरवठा होत असलेल्या भुतवडा तलाव पाणी साठा गेल्या दोन दिवसांपासून सातत्त्याने वाढतो आहे. नवीन व जुन्या तलावात आज ९० टक्के साठा झाला असून पावसाने जोर धरल्यास येत्या ५ ते ६ दिवसांत तलाव पूर्ण क्षमतेने भरून वाहील. या तलावात जवळपास दोन वर्षांचा पाणीसाठा आता उपलब्ध होणार आहे.





