नवी दिल्ली – पश्चिम बंगाल पंचायत निवडणूकीच्या मतदानाच्या दिवशी केंद्रीय दलाच्या तैनातीनंतरही वेगवेगळ्या भागातून हिंसाचाराच्या बातम्या येत आहेत. या हिंसाचारात गेल्या 24 तासांत पाच जिल्ह्यांत 9 लोकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतांमध्ये पाच टीएमसी कार्यकर्ते, एक कॉंग्रेस कार्यकर्ता, एक सीपीआय(एम) कार्यकर्ता, भाजप उमेदवाराचा पोलिंग एजंट आणि एका अपक्ष उमेदवाराचा पोलिंग एजंट यांचा समावेश आहे. 9 जूनपासून झालेल्या हिंसक घटनांमध्ये मृतांची संख्या 27 वर गेली आहे.
मतदानाच्या दिवशी बूथ लुटणे, मतपत्रिका फाडणे, मतपत्रिका जाळणे अशा घटना अनेक भागांतून पाहायला मिळाल्या. कूचबिहारच्या मठभंगा-1 ब्लॉकच्या हजरहत गावात एक तरुण मतपेटी घेऊन पळून गेल्याचीही घटना घडली. भारतीय सेक्युलर फ्रंट (आयएसएफ) आणि तृणमूलच्या(टीएमसी) कार्यकर्त्यांमध्ये दक्षिण 24 परगणामधील भागड ब्लॉकमधील जमीरगाची येथे संघर्ष झाला. त्यावेळी गावातील लोकांच्या आपबीतीनुसार, टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी पिशवीत बॉम्ब भरून आणले होते.
टीएमसीचे कार्यकर्ते गावातील लोकांना धमकावून मते मिळवत होते. त्यांनी इतके बॉम्ब फेकले की दोन तास मतदान थांबविण्यात आले. काही बॉम्ब पत्रकारांच्याही दिशेनेही फेकले गेल्याचेही सांगण्यात आले आहे. पश्चिम बंगालमधील 73,887 ग्रामपंचायतीपैकी 64,874 जागांवर शनिवारी मतदान पार पडले.
9,013 जागांवर उमेदवार बिनविरोध
राज्यात एकूण 73,887 ग्रामपंचायतींच्या जागा आहेत, त्यापैकी 9,013 जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. बिनविरोध निवडून आलेले सर्वाधिक 8,874 उमेदवार तृणमूल कॉंग्रेसचे आहेत. तर भाजपचे 63, कॉंग्रेसचे 40 आणि सीपीएमचे 36 उमेदवार बिनविरोध निवडून आले. 2018 च्या पंचायत निवडणुकांची आकडेवारी पाहिली तर 58,692 जागांपैकी 20,078 म्हणजेच 34.2% जागा बिनविरोध झाल्या होत्या. यातील जवळपास सर्वच जागा टीएमसीने जिंकल्या होत्या.