सहा लाख शेतकऱ्यांना अनुदान वितरीत; शेवगाव, पाथर्डी राहाता तालुक्यांत सर्वाधिक अनुदान वाटप
नगर – खरीप हंगामातील पिके पावसाअभावी वाया गेली. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान वाटपासाठी निधी उपलब्ध झाला. आतापर्यंत जिल्ह्यातील सहा लाख शेतकऱ्यांना अनुदान वितरीत करण्यात आले आहे. वाटप प्रक्रिया सुरू होऊन तीन महिने उलटले. परंतु अद्यापि 76 हजार 495 शेतकऱ्यांना अनुदाना पासून वंचित असल्याचे आकडेवारी समोर आली आहे.
गेल्या खरीप हंगामातील मदत यंदाच्या खरीप हंगामाच्या पेरणीसाठी तरी कामी येईल का, असा प्रश्न आता बाधित शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे. पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगाम हातचा गेला. त्यामुळे शासनाने जिल्ह्यातील 11 तालुक्यांतील 1 हजार 274, अकोले तालुक्यातील 116 गावे व दोन महसुली मंडलांतील 31, असे एकूण 1 हजार 600 गावांपैकी 1 हजार 421 गावांत दुष्काळ जाहीर केला होता. खरीप पिके हाती लागली नसल्याने, या बाधित शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती खालावली. दुष्काळी परिस्थितीने होरपळलेल्या बाधित शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानभरपाईपोटी हेक्टरी अनुदान देण्याचा निर्णय शासनाने जानेवारी महिन्यात घेतला होता.
त्यानुसार खरीप हंगामापोटी शासनाकडून 472 कोटी 91 लाख 98 हजार 960 रुपये अनुदान जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले. दुष्काळी गावांतील बाधित शेतकऱ्यांना दोन हेक्टरांपर्यत अनुदान दिले जाणार आहे. बागायती क्षेत्रासाठी हेक्टरी 6 हजार 800 रुपये ते 13 हजार 800 रुपये, तर बहुवार्षिक पिकांसाठी हेक्टरी 18 हजार रुपये अनुदान उपलब्ध करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने 6 लाख 78 हजार 493 बाधित शेतकऱ्यांसाठी 400 कोटी 53 लाख 93 हजार 900 रुपये अनुदान राष्ट्रीयीकृत बॅंकांकडे सादर केलेले आहे.
बॅंकांकडून गेल्या तीन महिन्यांपासून बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याचे काम सुरु आहे. आतापर्यत 399 कोटी 94 लाख 85 हजार रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा झाले आहे. याचा लाभ 6 लाख 2 हजार 941 बाधित शेतकऱ्यांना झाला आहे. अद्यापि 76 हजार 495 शेतकरी अनुदानापासून वंचित
राहिले आहेत.
चुकीचे बॅंक खाते असल्याने होतो विलंब
शेतकऱ्यांचे चुकीचा बॅंक खाते क्रमांक, आयएफएसी कोड चुकणे, बॅंक खाते आधार लिंक नसणे, यामुळे मोठ्या प्रमाणात अनुदान जमा करण्यास अडचण होत आहे. शेतकऱ्यांनी व्यवस्थित संबंधित कागदपत्रे दिल्यास हे अनुदान लवकरात लवकर जमा होईल. अनुदान वितरीत करण्यास कुठला विलंब होणार नाही, असे बॅंकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
तालुकानिहाय अनुदानापासून वंचित शेतकरी संख्या
जामखेड- 7 हजार 137, पारनेर- 8 हजार 688, नगर- 17 हजार 561, शेवगाव- 835, पाथर्डी- 552, राहुरी- 10 हजार 984, नेवासा- 7 हजार 215, राहाता- 561, संगमनेर-20 हजार 426, श्रीगोंदा- 2 हजार 301 तर कर्जत तालुक्यात-291 शेतकरी वंचित राहिले आहेत.
चुकीचे बॅंक खाते असल्याने होतो विलंब
शेतकऱ्यांचे चुकीचा बॅंक खाते क्रमांक, आयएफएसी कोड चुकणे, बॅंक खाते आधार लिंक नसणे, यामुळे मोठ्या प्रमाणात अनुदान जमा करण्यास अडचण होत आहे. शेतकऱ्यांनी व्यवस्थित संबंधित कागदपत्रे दिल्यास हे अनुदान लवकरात लवकर जमा होईल. अनुदान वितरीत करण्यास कुठला विलंब होणार नाही, असे बॅंकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.