प्रभा विलास यांनी मांडले वास्तव : स्वच्छ जागा नसल्याचे प्रमुख कारण
राजगुरूनगर -74 टक्के मुली शाळेत सॅनिटरी पॅड बदलत नाहीत. पॅड बदलण्यासाठी शाळांमध्ये स्वच्छ जागा नाही. देशात कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे आहे याला हे प्रमुख कारण आहे. ग्रामीण भागात सॅनटरी पॅड मिळत नाहीत. त्यामुळे ग्रामीण मुलींची मोठी अडचण होत आहे. शाळांमधून सॅनिटरी पॅड मिळण्याची 78 टक्के मुलींची मागणी आहे, अशी माहिती “मी शक्ती’च्या प्रभा विलास यांनी दिली.
खेड पंचायत समितीच्या सभागृहात मासिक पाळी व्यवस्थापन, व शाळेतील शौचालय व्यवस्था आढावा व परिवर्तन या बाबत वर्क फॉर इक्वॅलिटी या संस्थेच्या “मी शक्ती’ या नेटवर्कच्या वतीने किशोरी अधिवेशन राजगुरूनगर येथे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी प्रभा विलास बोलत होत्या.
याप्रसंगी खेड पंचायत समितीचे सभापती अंकुश राक्षे, विस्तार अधिकारी जीवन कोकणे, पर्याय प्रतिष्ठानचे वामन बाजरे, अशोक कडलक, मुख्याध्यापक बाळासाहेब आंधळे, नगरसेवक शंकर राक्षे, “मी शक्ती’च्या श्रद्धा तेलंगे, सामाजिक कार्यकर्ते अशोक कडलक, चांगदेव ढमाले यांच्यासह किशोरवयीन मुली व त्यांचे पालक उपस्थित होते.
प्रभा विलास, म्हणाल्या की, मी शक्ती माध्यमातून मुलींना प्रशिक्षण देण्यात येत असून त्यातून मासिक पाळी व्यवस्थापन केले जात आहे. मासिक पाळीबाबत गैरसमज दूर करणे गरजेचे आहेत. ग्रामसभेत याबाबत विषय घेतल्याने याचे महत्त्व वाढले आहे. ग्रामसेवक, मुख्याध्यापक, ग्रामस्थानी या उपक्रमाला सहकार्य करणे आवश्यक आहे.
सरकारच्या अनेक योजना आहेत. मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा शासन प्रयत्न करीत आहे. मात्र अनेक योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत नाही. सॅनेटरी पॅड बाबत ज्या शाळा उदासीनता दाखवतात त्या शाळांवर कडक कारवाई झाली पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.
या अधिवेशनात किशोर वयीन मुलींच्या मागण्यांच्या मसुद्याची प्रत मान्यवरांना देण्यात आली. यावेळी खेड मावळ तालुक्यातील अनेक मुलींनी शाळेतील मुलींच्या अनेक समस्या मांडल्या. त्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीचे लक्ष वेधले.
जिल्हा परिषदेच्या तालुक्यातील 5 वी ते 7 वी पर्यंतच्या 133 शाळांमधील 5 हजार विद्यार्थिनीसाठी सॅनेटरी नॅपकिन व डिस्पोजल साठीची सुविधा देण्यासाठी 15 व्या वित्तआयोग निधीत तरतूद करण्यासाठी जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा करू
– अंकुश राक्षे, सभापती, पंचायत समिती, खेड