– वंदना बर्वे
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने महाराष्ट्रातील पुरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 701 कोटीची मदत मंजूर केली आहे. ही मदत मागच्या वर्षी आलेल्या पुरात ज्यांचे नुकसान झाले त्या शेतकऱ्यांसाठी देण्यात आली आहे, हे येथे उल्लेखनीय आहे.
कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलताना सांगितले की, मागच्या वर्षी जून ते आक्टोबर या काळात महाराष्ट्रात महापूर आला होता. त्यात अनेक शेतकऱ्यांचे पीक उध्वस्त झाले होते. महाराष्ट्र सरकारने नॅशनल डिजास्टर रिस्पॉंड फंडमधून (एनडीआरएफ) मदत करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे दाखल केला होता.
तोमर म्हणाले की, गृह मंत्रालयाने प्रस्तावाचा अभ्यास केल्यानंतर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 701 कोटी रूपयाची मदत जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.
खासदार पवनराजे निंबाळकर आणि संजय जाधव यांनी मागच्या वर्षी झालेल्या महापुरात उस्मानाबाद आणि परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे किती नुकसान झाले ? याचा अंदाज घेण्यासाठी केंद्राने पाहणी केली आहे काय ? असा प्रश्न प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना तोमर यांनी 701 कोटी रूपयाच्या मदतीला मंजुरी देण्यात आली असल्याचे सांगितले.