मंचर-आगामी वर्षातील जुलै ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या आंबेगाव तालुक्यातील 30 ग्रामपंचायतीच्या प्रभागरचना, आरक्षण आणि प्रभागनिहाय मतदार यादीचे विभाजन कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे. शुक्रवार (दि.20) डिसेंबर 2019 ते शनिवार (दि.21) मार्च 2020 दरम्यान ही कामे करण्यात येणार असल्याचे तहसीलदार रमा जोशी यांनी सांगितले. मंचर आणि अवसरी खुर्द या
ग्रामपंचायतीचा या निवडणूक प्रक्रियेत समावेश आहे.
अवसरी खुर्द, मंचर, शेवाळवाडी, खडकवाडी, गावडेवाडी, साकोरे, भागडी, एकलहरे, वडगाव काशिंबेग, चिंचोली, खडकी-कारेगाव, पेठ, महाळुंगे पडवळ, लांडेवाडी-पिंगळवाडी, कोळवाडी-कोटमदरा, पिंपळगाव तर्फे म्हाळुंगे, भराडी, वळती, लौकी, शिरदाळे, जवळे, काठापूर बुद्रुक, शिंगवे, गिरवली, थुगाव, काळेवाडी-दरेकरवाडी, रानमळा, धोंडमाळ-शिंदेवाडी आणि कोलदरा-गोनवडी या 30 ग्रामपंचायतीच्या प्रभागरचना, आरक्षण आणि प्रभागनिहाय मतदार यादीचे विभाजन याचा कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे.
आंबेगाव तहसीलदार यांनी शुक्रवारी (दि.20) डिसेंबरपर्यंत संबंधित गावांचे नकाशे गुगल मॅपच्या साहाय्याने तयार करायचे आहेत. संबधित गावचे तलाठी व ग्रामविकास अधिकारी यांनी सोमवारी (दि.30) डिसेंबरपर्यत प्रत्यक्ष स्थळपाहणी करुन प्रभाग पाडणे, प्रभागांच्या सीमा निश्चित करुन अनुसूचित जाती आणि जमाती यांचे आरक्षण निश्चित करावे.शुक्रवारी (दि.10) जानेवारी 2020 पर्यत या प्रस्तावाला तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली समितीने प्रारुप प्रभागरचनेला मान्यता देणे. सोमवार दि.20 जानेवारीपर्यंत तहसीलदारांकडून आलेल्या प्रस्तावांची तपासणी करुन आवश्यक तेथे दुरुस्ती करणे. गुरुवार दि. 30 जानेवारीपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाने सुचवलेले बदल करुन प्रारुप प्रभागरचना आणि आरक्षणाला मान्यता द्यावी. तर आरक्षण सोडत काढण्यासाठी शनिवार दि.1 फेब्रुवारी रोजी विशेष ग्रामसभा बोलावण्यासाठी सुचना देण्यात यावी. मंगळवार दि.4 फेब्रुवारीपर्यत विशेष ग्रामसभा बोलावून प्रारुप प्रभाग रचनेवर आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे.
तहसीलदार यांनी शुक्रवार दि. 7 फेब्रुवारीपर्यंत प्रारुप प्रभाग रचना सुचना आणि हरकती मागवण्यासाठी सुचना प्रसिद्ध करणे. या प्रारुप प्रभागरचनेवर नागरिकांना शुक्रवार दि. 14 फेब्रुवारीपर्यत आक्षेप नोंदवता येतील. गुरुवार दि.20 फेब्रुवारीपर्यंत नागरिकांकडून आलेल्या हरकती उपविभागीय अधिकारी यांच्यासमोर सादर करणे. शनिवार दि. 29 फेब्रुवारीपर्यंत नागरिकांकडून आलेल्या सर्व हरकतींवर उपविभागीय अधिकारी निर्णय घेतील. आलेल्या सर्व हरकती व सूचनांवर सुनावणी घेवून अभिप्रायासह हा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे बुधवार दि.11 मार्चला सादर होईल.